एलिफंटा बेटावर विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या स्थानिक रहिवाशांना महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने बंदी घातल्याने स्थानिकांच्या रोजगाराचे संकट निर्माण झाले असून, उरण तालुक्यातील जागतिक ठेवा म्हणून मान्यता असलेल्या प्रसिद्ध एलिफंटा (घारापुरी) बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना वस्तूंचा विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या घारापुरी येथील ६४ दुकानदारांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. यासंदर्भात मेरिटाइम बोर्ड तसेच उरण तहसीलदारांना निवेदन देऊन घारापुरी येथील स्थानिकांचा रोजगार टिकविण्याची मागणी करण्यात आलेली आहे.घारापुरी बेटावर शेकडो वर्षांपासूनची लोकवस्ती आहे. या बेटावर एकूण तीन गावे आहेत. त्यापैकी प्रत्येक घरातील व्यक्ती ही या बेटावरील काळ्या पाषाणात कोरलेली लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुविधा देऊन आपला उदरनिर्वाह करीत आहे.बेटावर शिक्षण तसेच विजेची नियमित सोय नसल्याने अनेकांना उरण शहर तसेच परिसरात वास्तव्य करणे पसंत केले आहे. या ठिकाणावर आपल्या मुलांना शिक्षणाची सोय करून बेटावर व्यवसाय करणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. या व्यावसायिकांना हटविण्याठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने दिलेल्या नोटिसा म्हणजे येथील स्थानिकांवरील अन्याय असून कोणतीही सुविधा न देता असलेल्या रोजीरोटीचा व्यवसाय बंद करणाऱ्या या नोटिसा असून त्या त्वरित मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी घारापुरी येथील शिवसेनेचे विभागप्रमुख बळीराम ठाकूर यांनी या निवदेनाद्वारे केली आहे. बोर्डाच्या या अन्यायाविरोधात वेळ पडल्यास आंदोलनही केले जाईल, असा इशारा साहाय्यक बंदर निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. तसेच येथील स्थानिकांची दुकाने हटविण्याऐवजी त्यांना अधिक सुविधा देऊन पर्यटकांना आकर्षिक करणारी दुकाने तयार करून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे विभागीय निरीक्षक कॅप्टन सी. जी. लेपांडे यांच्याशी संपर्क साधला असता घारापुरीमध्ये १५ अधिकृत स्टॉल असून ६४ छोटी-मोठी अनधिकृत स्टॉल चालविली जातात त्यांनी अधिकृत व्यवसाय करण्यासाठी आमच्या विभागाकडे अर्ज करून परवानगी मागितल्यास त्यांना परवानगी दिली जाईल. यामध्ये स्थानिकांवर अन्याय करण्याचा कोणताच हेतू नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.