उपनगरी रेल्वेने ऐन गर्दीच्या वेळी प्रवास करताना ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, लहान मुले यांना प्रचंड हाल सोसावे लागतात. प्रवाशांच्या सोयीसाठी नजिकच्या काळात मध्य रेल्वेच्या दादर, विक्रोळी, ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस या रेल्वेस्थानकांमध्ये सरकते जिने बसिवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील या रेल्वेस्थानकांसह पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर अशा एकूण पाच डिव्हिजनच्या रेल्वेस्थानकांवर एकूण ३४ सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. 
अनेक रेल्वेस्थानकांच्या ठिकाणी महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक जिने चढण्याचा अगर उतरण्याचा त्रास वाचविण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा मार्ग पत्करतात. परंतु, त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या प्रचंड वाढते. ऐन गर्दीच्या वेळी अनेकदा प्रवासी शारिरीक त्रास वाचविण्यासाठी असे मार्ग पत्करतात. त्याशिवाय अंध, अपंग प्रवाशांनाही फलाटांवर ये-जा करण्यासाठी जिन्यांचा वापर करणे अनेकदा जिकीरीचे ठरते. अशा प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जिने बसविण्यात येणार असून मुंबईतील रेल्वेस्थानकांना प्राधान्य देण्यात आले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी दिली.