जीवनाला समृद्ध करणारे अनुभव हे साहित्यात उतरणे गरजेचे आहे. अशा अनुभवातून व्यक्त झालेले लेखन हे समाजासाठी महत्त्वाचे असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी व्यक्त केले.
येतील थोरले प्रतापसिंह महाराज नगरवाचनालयाच्या पाठक सभागृहात प्रा. श्रीकृष्ण अडसूळ यांनी लिहिलेल्या ‘साथसोबत’ व ‘इरसाल’ या पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी कर सल्लागार अरुण गोडबोले, प्रा. सुहासकुमार बोबडे, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके आदींची उपस्थिती होती. प्रा. अडसूळ हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. विविध प्रकारच्या अनुभवाने त्यांचे जीवन संपन्न झाले आहे. त्यामुळेच त्यांनी लिहिलेल्या लेखनाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे, असेही डॉ. दाभोळकर यांनी नमूद केले.
अरुण गोडबोले यांनी प्रा. अडसूळ यांच्या लेखनात एक अस्सल ग्रामीण बाज दडलेला आहे. आयुष्याशी संघर्ष करणारी, सतत धडपडणारी माणसे ही त्यांच्या लिखाणात पाहावयास मिळत असल्याचे सांगितले. प्रा. अडसूळ यांनी जीवनात सदैव आनंदी वृत्ती बाळगणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. आईचे संस्कार व वडिलांची प्रेरणा यामुळेच मी साहित्यकृती निर्माण करू शकलो, असेही त्यांनी सांगितले. चंद्रकांत धनवडे यांनी प्रा. अडसूळ यांच्या कर्तृत्वाचा परिचय करून दिला. संजय शिंदे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू विशद केला. यशेंद्र क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. अंकुश गायकवाड यांनी आभार मानले.
दरम्यान, या कार्यक्रमात प्रा. श्रीकृष्ण अडसूळ व वीणा अडसूळ यांच्या विवाह पंचविशीनिमित्त मित्र मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास ‘सकाळचे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, स्वातंत्र्यसैनिक संतराम अडसूळ, सातारा जिल्हा हॉटेल आसोसिएसनचे अध्यक्ष राजू भोसले, निवृत्त उपजिल्हाधिकारी चंद्रकांत गीते, अरुण आदलिंगे, निवृत्त तहसीलदार विजय जाधव, पांडुरंग गायकवाड, गटशिक्षणाधिकारी अरुणा भुजबळ, अ‍ॅड. जयश्री डोके, अ‍ॅड. सूर्यकांत धनवडे, वैजयंती धनवडे, कांता भोसले, अंकुश नावडकर, के. जी. गायकवाड, शहाजी गायकवाड, तरडगावचे माजी सरपंच वसंतराव अडसूळ आदींची उपस्थिती होती.