शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ात गेली काही वर्षे राबविण्यात येत असलेल्या विविध नावीन्यपूर्ण योजनांपैकी एक असणाऱ्या मत्स्यपालन योजनेचा ठाणे जिल्ह्य़ातील ४५० शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून, त्यापैकी बहुतेक जण पहिल्यांदाच मत्स्यपालन करीत आहेत. माजी जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांच्या पुढाकारातून कृषी आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहकार्याने जिल्हा प्रशासनाने ही योजना राबवली आहे.
रुहू, कटला आणि मृगळ जातीच्या माशांची पैदास हे शेतकरी करीत आहेत.
प्रशासनाने त्यांना रीतसर प्रशिक्षणासह प्रत्येकी दोन हजार मत्स्यबीजे दिली आहेत. आदिवासी शेतकऱ्यांना ९० टक्के, तर इतर शेतकऱ्यांना या योजनेत ७५ टक्के अनुदान देण्यात आले आहे. शेती शाश्वत करण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ात रोजगार हमी तसेच अन्य योजनांमधून शेकडो शेततळी खोदण्यात आली आहेत. त्यातील मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत पाणी टिकून राहणाऱ्या तळ्यांमध्ये मत्स्यपालन करून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळविता येणार आहे.