पूर्ववैमनस्यातून अलिबागमधील मांडवा परिसरातील शेतकऱ्याला त्याच्या गावातील काही जणांनी अपहरण करून लुटले असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. गवाणफाटा येथील चिरनेर रोडवर हे अपहरण नाटय़ रंगले. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी सात जणांविरोधात अपहरण, जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
योगेश नथुराम गावंड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. कामनिमित्त वाशी येथे आलेले गावंड काम उरकून गावी परत येत होते. दुपारी अडीचच्या सुमारास चिरनेरमार्गे त्यांची गाडी येत असताना त्यांच्या कारसमोर अचानक कार आल्याने त्यांच्या कार चालकाने गाडी थांबवली. यावेळी दुसऱ्या कारमधून त्यांच्याच गावाचे चेतन घरत, गणेश पाटील, वामन दामोदर घरत यांनी त्यांच्या इतर चार साथीदारांच्या साह्य़ाने गावंड यांच्या कारवर हल्ला चढवला. यानंतर गावंड यांच्या कार चालकाला मारहाण करण्यात आली. आरोपींनी गावंड यांना स्वत:च्या कारमध्ये जबरदस्ती बसवत वाशी येथील एका निर्जन ठिकाणी आणले. यानंतर त्याच्याकडील दोन लाखांचे दागिने आणि ५० हजारांची रोख रक्कम घेऊन त्यांना तेथेच सोडून पळ काढला. या प्रकरणी गावंड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती यमगर हे करीत आहेत.