विविध शंकांचे शास्त्रज्ञांकडून निरसन
‘कृषी वसंत’च्या निमित्ताने देशभरातून शेतकरी नागपुरात आले आहेत. मनात शंकांचे गाठोडे घेऊन आलेले जिज्ञासू शेतकरी या कृषी पंढरीचे वारकरी बनले आहेत. देशातील कृषी क्षेत्राची प्रगती, आधुनिकतेची कास जाणून घेण्याची इच्छा, ऊर्जा आणि उत्साह या वारक ऱ्यांमध्ये आहे. पीक संरक्षण व उत्पादन वाढीसाठी त्यांना हवे ते मार्गदर्शन, त्यांना समजेल त्या भाषेत राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात शास्त्रज्ञांकडून मिळत आहे.
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या परिसरात आयोजित कृषी वसंत २०१४ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात  सभागृह एक व दोनमध्ये दररोज दोन सत्रात शेतकरी – शास्त्रज्ञ संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, झारखंड, गुजरात, दीव-दमण, दादरा-नगर-हवेली, आंध्रप्रदेश, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल यासह विविध राज्यातील शेतकऱ्यांनी पिकांवरील रोग नियंत्रण, उत्पादकतेत वाढ, विपणन शैली, यांत्रिक शेती, फळबागा, आदी संदर्भातील विविध प्रश्नांबाबात शास्त्रज्ञांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
सोलापूरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जोस्ना शर्मा, कृषी अभ्यासक अमोल शेटे,  राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. के. पाल, डॉ. नीलेश गायकवाड यांनी डाळिंब लागवडीतून आर्थिक सुबतत्ता कशी येते यावर मार्गदर्शन केले. डाळिंब लागवडीची कास धरा, असा सल्ला डॉ. पाल यांनी दिला. डाळिंब लागवड करताना भगवा, गणेश या जातीचे वाण वापरावे, छाटणी करताना स्वतंत्र अवजारे वापरावी, आंतरपीक घेताना झेंडू, सरू, बाबूंच्या झाडांची घ्यावी, सिंचनाची योग्य व्यवस्था करावी, असे डॉ. शर्मा यांनी सांगितले. अमोल शेटे यांनी आधुनिक डाळिंब लागवड तंत्रज्ञान यावर पॉवरपॉईंटच्या माध्यमातून माहिती देत शेतक ऱ्यांशी संवाद साधला. डॉ. गायकवाड यांनी डाळिंबाची लागवड आणि  बाजारातील आयात, निर्यात, विपणन शैली आदीवर माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले आणि कापूस शेतीतज्ज्ञ डॉ. ए. एन. पासलवार यांनी शेतकऱ्यांना तणनाशक, उत्पादन वाढ, धान समस्या, अमरवेल आणि ऊसावरील रोग याबाबत मार्गदर्शन केले.
सोयाबीन उत्पादन आणि प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर मध्यप्रदेशातील शास्त्रज्ञ डॉ. बी.यू. दुपारे, डॉ. सी.यू. पाटील, सुनीता चव्हाण, योगिता सानप यांनी मार्गदर्शन केले. डाळींच्या तुलनेत सोयाबीन अधिक किफायतशीर आहे. त्यात कुपोषणावर मात करण्यासाठी सोयाबीन फारच उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. शेती, फर्टिलायझर, शेती प्रक्रिया उद्योग, आधुनिक उपकरणे, हवामान, कीड व्यवस्थापन, सिंचन, कर्ज प्रकरणे आदी विषयांवर कृषी मंत्रालयाच्या कृषी व सहकार विभागाचे सचिव आशिष बहुगुणा यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला.