शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राला विजेचा धक्का बसल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. माढा तालुक्यातील पिंपळनेर येथे ही दुर्घटना घडली. शेजारच्या शेतक ऱ्याने त्याच्या शेताच्या बांधावर तारेच्या साह्य़ाने विद्युत प्रवाह सोडला होता. रात्रीच्यावेळी शेतात पाणी सोडण्यासाठी गेलेल्या दोघा पिता-पुत्राला मात्र त्यामुळे जीव गमवावा लागला.
राजकुमार मन्मथ कांबळे (वय ५५) व त्याचा मुलगा प्रदीप कांबळे (वय २३) अशी मृतांची नावे आहेत. मृत राजकुमार कांबळे हे आपल्या शेतात उसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्याचवेळी शेजारच्या एका शेतकऱ्याने आपल्या मक्याच्या शेतीच्या कडेला बायिडग वायरने विद्युत प्रवाह सोडला होता. त्याची माहिती नसल्याने त्याठिकाणी गेलेल्या दोघा बाप-लेकाचा बळी गेला. माढा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.