दरहजारी मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण सन १९७१ पासून सातत्याने घटल्याचे दिसून येते. सन २००१ च्या जनगणनेत तब्बल १५ जिल्ह्य़ांमध्ये मुलींचे हजारी प्रमाण घसरले. शहरी व ग्रामीण भागाचा विचार करता बीड जिल्ह्य़ातील मुलींचे घटते प्रमाण राज्यासाठी धोक्याची घंटा ठरणारे असल्याचा इशारा २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीत दिसून आल्याचे मंगळवारी येथे सांगण्यात आले. जनगणना आकडेवारीचा नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना अभ्यास करता यावा, यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यशाळेत विविध माहितीचे सादरीकरण करण्यात आले. मुलींच्या जन्मदराबाबत केलेल्या सादरीकरणात बीड जिल्ह्य़ाची स्थिती धोकादायक असल्याचेच आढळून आले.
राज्यात दरहजारी मुलांच्या तुलनेत मुलींच्या प्रमाणात २०११ च्या जनगणनेत सातने वाढ दिसून आली. २००१ मध्ये दरहजारी ९२२ मुली होत्या. दशकभरानंतर ही आकडेवारी ९२९ वर गेली. ग्रामीण भागात दरहजारी मुलींचे प्रमाण आठने कमी झाले, तर शहरी भागात ते ३० ने वाढले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा व भंडारा या जिल्ह्य़ांमध्ये दरहजारी मुलींचे प्रमाण इतर जिल्ह्य़ांच्या तुलनेत चांगले आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात मुलांपेक्षा मुलींची संख्या १२२ ने, तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ३६ने अधिक आहे. मराठवाडय़ातील बीड हा यात तळाच्या क्रमांकावरील जिल्हा आहे. मराठवाडय़ाच्या ग्रामीण भागात मुलींचे घटते प्रमाण थांबविण्यासाठी तातडीने पावले उचलावी लागतील, अशीच आकडेवारी जनगणनेत आहे.
गर्भलिंग चिकित्सा टाळण्याचे नियोजन
गर्भलिंग निदान चाचणी केली जाऊ नये, म्हणून राज्य सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या. डॉ. मुंडे दाम्पत्याच्या कारनाम्यामुळे बीडमधील मुलींचे घटते प्रमाण राज्यभर चर्चेचा विषय झाला. त्यानंतर काही उपक्रम सुरू झाले. या अनुषंगाने बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर म्हणाले की, गेल्या एक-दीड वर्षांत गर्भलिंग चिकित्सा होऊ नये, यासाठी खूप विस्तृत व सखोल नियोजन केले आहे. वर्षभरात काही चांगले परिणामही दिसू लागले आहेत. येत्या काही दिवसात स्थिती बदललेली असेल. कोणत्या स्तरावर कोणत्या अधिकाऱ्यांनी आढावा घ्यायचा, जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांनी या विषयात कोणते काम करायचे, हे ठरवून दिल्यामुळे आकडेवारीत पुढील काळात नक्की फरक पडेल, असा दावा त्यांनी केला.
विभागाचीही घसरण
गेल्या दशकात बीड जिल्ह्य़ात दरहजार मुलांच्या तुलनेत मुलींच्या प्रमाणात २० ने घट झाली. २००१ मध्ये मुलींचे प्रमाण ९३६ होते. २०११ मध्ये ते ९१६ झाले. त्या पाठोपाठ हिंगोली, परभणी व जालना या जिल्ह्य़ांचा क्रमांक लागतो. नांदेडवगळता लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्य़ातील मुलींचे दरहजारी प्रमाण गेल्या जनगणनेच्या तुलनेत उणे चिन्हातच नोंदविले आहे. शून्य ते ६ वयोगटातील मुलींचे घटते प्रमाण बीड जिल्ह्य़ातच अधिक आहे. गेल्या जनगणनेच्या तुलनेत या वर्षी ८७ मुली कमी झाल्या. या वयोगटात बीड जिल्ह्य़ात ८९४ मुलींची नोंद होती. ती २०११ च्या जनगणनेत ८०७ आहे. एकूणच बीडमधील मुलींचे घटते प्रमाण हा राज्यकर्त्यांची चिंता वाढविणारे आहे.