येथील चापमणवाडी भागात गुरुवारी रात्री दोन वाजणाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत  पाच घरांची अक्षरक्ष राखरांगोळी झाली. यामुळे  ही सर्व कुटुंबे उघडय़ावर आली आहेत. या पाचही घरातील आगीत एकही वस्तू शिल्लक राहिलेली नाही. सुर्दैवाने प्राणहानी झाली नाही.
या भागात मनोज पुरणलाल गुप्ता यांचा फरसाणचा बनविण्याचा कारखाना आहे. त्यांच्यात बाजूला पंकज चौबे, चंद्रभान डांगे, रामचंद्र रावत, संजय चौबे यांची घरे आहेत. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मनोज गुप्ता यांच्या कारखान्याला आग लागली आणि आगीच्या ज्वाळांमध्ये लागूनच असलेली लाकडाची चारही घरे जळून खाक झाली.
सर्वाच्या घरातील अन्नधान्य, कपडे, दूरदर्शन संच, रेफ्रिजेटर्स इत्यादी सारे आगीच्या भक्षस्थानी पडले. आग विझविण्यासाठी परिसरातील लोकांनी अथक प्रयत्न केले. अग्निशमन दलही येऊन पोहोचल्याने आग विझली आणि प्रचंड अनर्थ टळला.
घटनास्थळी चंद्रकांत पांडे, तहसीलदार बोरकर, भगत तसेच नगरसेवक दत्ता कुळकर्णी, कमल मिश्रा, संतोष बोरले यांनी धाव घेतली. माजी आमदार मदन येरावार यांनी देखील या घरांची पाहणी केली. या आगीत सर्वस्व हरवलेल्यांचे त्यांनी  सांत्वन केले. तसेच सरकारच्यावतीने त्यांना तातडीची मदत करण्यात आल्याचे समजते.