वसमत तालुक्यातील बोरगाव येथील तीन शेतकऱ्यांचा कापूस घेऊन जाणाऱ्या मालमोटारीला लागलेल्या आगीत ९५ क्विंटल कापूस जळून खाक झाला. विठ्ठल कोटे यांच्या फिर्यादीवरून वाहनचालक सचिन जयाची वाव्हळे यांच्याविरुद्ध कुरुंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.बोरगाव येथील विठ्ठल किशन कोटे, अशोक कोटे व केशव नामदेव कोटे या तिघांनी मिळून मालमोटारीत (एमएच १९ झेड ३१८१) सुमारे ९५ क्विंटल कापूस भरला. मालमोटार सुरमणी जिनिंग प्रेसिंगवर जात होती. वाहनचालक सचिन वाव्हळे यांचा वाहनावरील ताबा सुटून मार्डी पुलावरून मालमोटार खाली कोसळली आणि कापसाला आग लागून सुमारे ३ लाख ५८ हजारांचा कापूस व ५ लाख ५० हजारांची मालमोटार जळून खाक झाली. शेतकरी विठ्ठल कोटे यांनी कुरुंदी पोलीस ठाण्यात अपघाताची खबर दिली. वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.