औरंगाबाद रस्त्यावरील ओमसाई ढाब्याजवळ देण्या-घेण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान हवेत गोळीबार होण्यात झाले. सोमवारी मध्यरात्री येथील या संदर्भात तालुका जालना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली.
लक्ष्मण हरकळ, डॉ. रवींद्र राठोड, परसराम यादव व शेख बबलू हे चौघे ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. तेथून बाहेर पडल्यावर मोटारीच्या देण्या-घेण्याच्या वादातून शेख बबलूने आपल्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार हरकळने दिली. हरकळ याने स्वत:जवळील रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केल्याची तक्रार रात्रीच शेख बबलू याने दिली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळास भेट दिली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीनंतर चौघांनाही तालुका जालना पोलिसांनी अटक केली.