वातावरणातील बदलामुळे पडणारा अवकाळी पाऊस व मच्छीमारांना गेल्या दोन वर्षांपासून कोटय़वधी रुपयांचे डिझेलचे परतावे न दिल्याने मासेमारी व्यवसाय संकटात सापडला आहे. याचा परिणाम मासेमारीसाठी लागणाऱ्या मजुरांच्या समस्येवरही होऊ लागला आहे. राज्यात एकूण ४ लाख ६७ हजार ४५८ मेट्रिक टन मासळीचे उत्पादन होत असून यापैकी परदेशात निर्यात होणाऱ्या मासळीच्या उत्पादनातून केंद्र सरकारला २ हजार ८०० कोटींचे परकीय चलन मिळत असतानाही या रोजगाराकडे केंद्र व राज्य सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात मच्छीमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबाची संख्या १५ लाखापेक्षा अधिक आहे. या व्यवसायातून लाखोंना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत आहे. मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात जावे लागते, त्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागतो. या दिवसात मासळी मिळाली तर ठीक, नाही तर त्यासाठी खर्च करण्यात आलेले डिझेल व मजुरी याचे नुकसान सहन करावे लागते. त्यातच वातावरणातील बदलामुळे पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे मासळीच मिळत नसल्याने मजूर दुसऱ्या व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे मासेमारी काम करणाऱ्या मजुरांची संख्या घटू लागल्याने मजुरीतही वाढ झाली आहे. दुसरीकडे शासनाकडून मच्छीमारांना मासेमारीसाठी लागणारे डिझेल व जाळी, बोटीच्या बांधणीसाठीचा लागणारा निधी यात घट करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून प्रत्येक बोटीसाठी लाखो रुपयांचा देण्यात येणारा डिझेल परतावा गेल्या दोन वर्षांपासून वेळेत मिळत नसल्याने मच्छीमार कर्जबाजारी होऊ लागले आहेत. जमिनीवरील प्रदूषणाबरोबरच आता समुद्रातील प्रदूषणाचाही प्रश्न गंभीर बनला आहे. समुद्र व खाडीत टाकण्यात येणारे थर्माकोलचे मखर, पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या तसेच कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्या, त्याचप्रमाणे अनेक प्रकारची मोठमोठी झाडेही प्रवाहातून येत असून जाळी फाटण्यांचे नवे संकट मच्छीमारांसमोर उभे ठाकले आहे. राज्य व केंद्र सरकारकडे आर्थिक तरतुदीची वारंवार मागणी करण्यात आल्याने याची दखल घेत राज्य सरकारकडून १०० कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती करंजा मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिले आहे. आवक घटल्याने मासळीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. वारंवार येणाऱ्या संकटामुळे मासळीचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे मासळीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. सुक्या मासळीच्या दरातही भरमसाट वाढ झाल्याने खाडी किनारी वास्तव्य करणाऱ्या व मासळी हे पारंपरिक खाद्य असलेल्यांवरही संकट आल्याचे कोंढरी येथील रहिवासी आकाश भोईर यांनी सांगितले आहे.