निरा खोऱ्याबरोबरच राज्यातील सर्व मोठय़ा साखर कारखान्यात अकलूजच्या सहकार महर्षी साखर कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळप करून उच्चांक केला आहे.
तांत्रिक बिघाडाने मागील सलग २ वर्षे गाळपात अडचणी येत असणाऱ्या या साखर कारखान्याने दि. २० डिसेंबरअखेर म्हणजे हंगामातील ५९ व्या दिवसांपर्यंत ४ लाख ७१ हजार १३२ मे. टन उसाचे गाळप केले आहे. हुपरी कोल्हापूरच्या जव्हारने २ लाख ७२ हजार ४९० शिरोळ कोल्हापूरच्या दत्तने २ लाख ३१ हजार ६०० तर वारणाने ३ लाख ५३ हजार ४०१ मे टन ऊस गाळप केल्याच्या नोंदी आहेत. हे कारखाने ऊस गाळप व साखर उत्पादनात अग्रेसर गणले जातात. मात्र या हंगामात सहकार महर्षीने सर्वानाच मागे टाकल्याचे दिसत आहे.
निरा खोऱ्यातील माठय़ाच्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने त्या पाठोपाठ ४ लाख ६४ हजार ५७२ मे टन तर श्रीपूरच्या पांडुरंगने ३ लाख ११ हजार ५८९ तर पंढरपूरच्या विठ्ठल ने ३ लाख ३ हजार ४०० मे टन उसाचे गाळप केले आहे. निरा खोऱ्यात यावर्षी २२ सहकारी तर ११ खासगी साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. विजय शुगर करकंब, आयर्न शुगर बार्शी, इंद्रेश्वर बार्शी, जकराया मोहोळ, भैरवनाथ विटाळ, मातोश्री अक्कलकोट, सीताराम शुगर खर्डी व सद्गुरू राजेवाडी या खासगी साखर कारखान्यांनी यावर्षीपासून गळीत हंगाम सुरू केला आहे. निरा खोऱ्यातील सदाशिवनगरच्या श्री. शंकरने १ लाख २७ हजार, माळीनगरच्या दि सासवड माळी शुगरने १ लाख ६४ हजार ६६०, भाळवणीच्या चंद्रभागाने १ लाख ४७ हजार ८०६, टाकळीच्या भीमाने २ लाख, अनगरच्या लोकनेतेने २ लाख, माढय़ाच्या कुर्मदासने ५० हजार, म्हैसगावच्या विठ्ठल शुगरने १ लाख ८३ हजार, करमाळ्याच्या आदिनाथने २ लाख ६ हजार, तर मकाईने १ लाख ६ हजार, मंगळवेढय़ाच्या संत दामाजीने १ लाख ४८ हजार , लोकमंगलच्या सोलापूर युनिटने १ लाख २१ हजार तर भंडार कवटे युनिटने २ लाख ९१ हजार, सोलापूरच्या सिद्धेश्वरने २ लाख ५९ हजार, भवानीनगरच्या छत्रपतीने १ लाख ७५ हजार, इंदापूरच्या कर्मयोगीने २ लाख ५६ हजार, बारामतीच्या माळेगावने २ लाख ५० हजार तर सोमेश्वरने १ लाख ७८ हजार मे. टन उसाचे गाळप केले आहे.