गेल्या अनेक वर्षांपासून सोबत राहणाऱ्या एका मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. प्रकाश राजेश चव्हाण हे मृतकाचे नाव असून तो मुंबईचा रहिवासी आहे. आरोपी संतोष शांतीकुमार खलप याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सिव्हील लाईन भागातील बुटी बिल्डींगमध्ये रिलायन्स कंपनीच्या कार्यालयाचे काम सुरू असून त्या ठिकाणी गेल्या दहा दिवसापासून संतोष खलप आणि प्रकाश चव्हाण हे इलेक्ट्रीक काम करीत होते. मुंबईच्या एका कंत्राटदाराला इलेक्ट्रिकच्या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. दोघांनाही येथे काम मिळाले आहे. आठ दिवसापूर्वी रिलायन्स कंपनीमध्ये इलेक्ट्रिकचे काम करण्यासाठी हे दोघे मुंबईहून नागपुरात आले. प्रकाश चव्हाण हा तोतरा बोलतो. त्यामुळे त्याचे मित्र त्याची नक्कल करीत असतात. मंगळवारी रात्री दोघे काम करीत असताना संतोषने प्रकाशला तोतडा बोलतो म्हणून चिडविले. त्या कारणावरून प्रकाश संतापला आणि त्याने संतोषला काठीने मारले. ती काठी त्याला जोरदार लागल्याने संतोषने जवळच असलेल्या कटरने प्रकाशच्या मानेजवळ वार केल्यानंतर रक्स्त्राव होऊ लागला. तो जागीच कोसळल्यामुळे त्या ठिकाणी काम करीत असलेल्या काहींनी प्रकाशला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टारांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती सीताबर्डी पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी काम करणाऱ्या काही कामागारांनी पोलिसांना मृतकानेच स्वतच्या हाताने वार करून घेतले असल्याचे सांगितले त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती मात्र आज आज सकाळी घटनेची चौकशी केल्यानंतर संतोष खलप या त्याच्या मित्राने शस्त्राने मारले असल्याचे कळल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी आणि मृतक दोघेही मुंबईत एका वस्तीत राहणारे आहे. संतोष खलप याने इलेक्ट्रीकच्या कामाचे प्रशिक्षण घेतले असून तो गेल्या अनेक दिवसांपासून काम करीत आहे.
प्रकाश चव्हाण हा त्याच्यासोबत काम करीत असताना त्याने सर्व या कामाचे प्रशिक्षण घेतले. कंत्राटदाराकडे काम करीत असताना कुठेही काम असेल तर दोघेही सोबतत जात होते. सीताबर्डी पोलीस या घटनेची चौकशी करीत आहेत.