जननी सुरक्षा कार्यक्रम व गर्भधारणापूर्व, प्रसूतीपूर्व िलगनिदान तंत्र कायद्याची योग्य माहिती विविध माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचत असल्यामुळे मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या जानेवारीत मुलींचा जन्मदर दर हजारामागे ९५१ असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर पाठक व वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर देशमुख यांनी पत्रकार बैठकीत दिली.
देशभरात गरोदर स्त्रियांचा मृत्यूदर मोठा होता. तसेच शून्य ते एक वर्ष वयोगटातील बालकांचे मृत्यूचे प्रमाणही प्रचंड होते. प्रसूती दवाखान्यात व्हावी, या दृष्टीने सरकारने ऑक्टोबर २०११पासून जननीसुरक्षा कार्यक्रम राबविला. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.
तीन वर्षांपूर्वी दवाखान्यातील प्रसूतीचे प्रमाण ४० ते ४५ टक्के होते. ते आता तब्बल ९८ ते ९९ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या १ एप्रिल ते ३१ जानेवारी दरम्यान ४३ हजार ७१९ महिलांची दवाखान्यात प्रसूती झाली. तर केवळ ६७४ प्रसूती घरी झाल्या. सरकारने जिल्हय़ात ६७ रुग्णवाहिकांमार्फत गरोदर मातांना रुग्णालयात मोफत नेण्याची सुविधा उपलब्ध केली. त्याचा लाभही चांगल्या प्रमाणात घेतला जात असल्याचे दिसून येते.

शिरूर, उदगीरमध्ये विक्रमी
२०११मध्ये जिल्हय़ात दरहजारी स्त्रियांचे प्रमाण ९२४ होते. शून्य ते ६ वयोगटात हे प्रमाण ८७२ होते. गेल्या २ वर्षांत प्रबोधनपर कार्यक्रम घेतले गेल्यामुळे समाजाची मानसिकता आता बदलत आहे. डॉक्टरही गर्भिलगनिदान करीत नाहीत. परिणामी मुलींचा जन्मदर ८७२वरून चालू वर्षी जानेवारीत ९५१वर पोहोचला. रेणापूर तालुक्यात हे प्रमाण १ हजार, निलंग्यात ९७८, उदगीर ९५९, तर लातुरात ९३३ असे आहे. गेल्या ऑक्टोबरात शिरूर अनंतपाळ तालुक्यात १ हजार २१७, तर उदगीर तालुक्यात १ हजार ११६ इतका विक्रमी मुलींचा जन्मदर पोहोचला असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.