पुन्हा तोच विषय आणि तोच उपाय.. बलात्काराच्या व स्त्री अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल पिंपरीच्या महापौर मोहिनी लांडे यांनी जाहीर कार्यक्रमात चिंता व्यक्त केली.. पण ‘आपला पेहराव व वागणे व्यवस्थित ठेवल्यास बरेच नकोसे प्रसंग टळतील,’ असा सल्ला मुलींनाच दिला. इतकेच नाही तर ‘मुलांना दोष देऊन चालणार नाही, तर आपणही मर्यादेत राहिले पाहिजे,’ असे म्हणत मुलींना मर्यादाही घालून दिली.
जनअधिकार फाऊंडेशनने पिंपरीत आयोजित केलेल्या पहिल्या शिक्षण हक्क परिषदेचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले, तेव्हा त्यांनी असे वक्तव्य करून पुन्हा या विषयाला तोंड फोडले. या कार्यक्रमाला एमआयटीचे संस्थापक प्रा. विश्वनाथ कराड, डॉ. एस.एन. पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत महापौरांनी मुलींना हे सल्ले दिले.
बलात्कारासारख्या घटना का घडतात, याचा गंभीरपणाने विचार केला पाहिजे, असे सांगून महापौर म्हणाल्या, ‘‘पालकांनी वयात आलेल्या मुला-मुलींकडे लक्ष दिले पाहिजे. गाव सोडून दूर आलेल्या मुली वसतिगृहात राहतात, त्यांचे राहणीमान कसे असते व त्यातील अनेक मुलींचे कपडे कसे असतात, याकडे पाहिले पाहिजे. अलीकडे मुली बिनधास्त झाल्या आहेत. अशातून नको ते प्रकार घडतात. केवळ मुलांना दोष देऊन चालणार नाही व त्याने हा प्रश्न सुटणारही नाही. मुला-मुलींवर चांगले संस्कार झाले पाहिजेत तरच पुढील काळात ‘नको ते’ प्रकार थांबतील. दिल्लीतील घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. या घटनेनंतर असे प्रकार होणार नाहीत, असे वाटत होते. प्रत्यक्षात त्यात वाढ झाल्याचे वर्तमानपत्र व टीव्हीतील बातम्यांतून दिसते.’’
महिला महापौराने मुलींना असा सल्ला दिल्यामुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी करावयाच्या उपायांचा मुद्दा पुन्हा विषय ऐरणीवर आला आहे. मुलींनी मर्यादेत राहायचे की पुरुषांनी मानसिकता बदलायची, ही चर्चा यानिमित्ताने आता पुणे-पिंपरीतही पोहोचली आहे.

फक्त मुलींनीच मर्यादेत राहायचे का?
महापौर लांडे यांनी जाहीर कार्यक्रमात मुलींना दिलेला हा केवळ वैयक्तिक प्रश्न नाही, तर आपण महिला अत्याचाराच्या समस्येकडे अजूनही कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहोत, हेच दर्शवणारा आहे. हे अत्याचार टाळण्यासाठी फक्त महिलांनीच मर्यादेत राहायचे की पुरुषांचीही याबाबत काही जबाबदारी आहे, या मुद्दय़ाची जाहीर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘लोकसत्ता’ने वाचकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या वक्तव्यावर आपल्या प्रतिक्रिया ls.vruttant@expressindia.com  या ई-मेलवर किंवा ‘लोकसत्ता, एक्स्प्रेस हाऊस, १२०५/२/६, शिरोळे रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ४११००४’ या पत्त्यावर जरूर कळवा. (पाकिटावर ‘लोकसत्ता व्यासपीठ’ असा उल्लेख करा.)
-निवासी संपादक