डोंबिवलीत म्हैसकर फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सुश्राव्य शोधच्या चौथ्या पर्वातील स्पर्धेत १५० स्पर्धक सहभागी झाले होते. कल्याण परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुरेल गाणी गाऊन उपस्थित रसिकांना तीन तास मंत्रमुग्ध केले. ‘हा कार्यक्रम पाहून ताजेतवाने वाटले. चांगला गायक म्हणून पुढे येण्यासाठी कठोर मेहनत आवश्यक आहे. हेच यशाचे फळ असते, असे प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी विद्यार्थी, पालकांना उपदेश करताना सांगितले.
अंतिम स्पर्धेसाठी दहा स्पर्धकांची निवड गायक अवधूत गुप्ते व जान्हवी प्रभू-अरोरा यांनी केली. जुन्या जमान्यातील उत्तमोत्तम मराठी, हिंदी गाणी स्पर्धकांनी गायली. त्यास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत अनन्या नाईक, धवल भागवत व प्रणव पाटील, अनघा नारकर हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. आर्यन म्हैसकर याने गाणे, इशा बाळ, रिदीमा म्हैसकर यांनी नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत वाढवली. सर्व स्पर्धकांचे संयोजक सुधा म्हैसकर यांनी कौतुक केले.