शब्द आणि त्यातील मर्म याची प्रचिती वाचणाऱ्याच्या आकलन क्षमतेवर अवलंबून असते असे नेहमी म्हटले जाते. मात्र ही वीण अक्षर लेखनाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न येथील सुलेखनकार नंदू गवांदे करत आहेत. आजच्या पिढीला वाचन संस्कृतीकडे वळवितांना कुठलाही तात्विक मारा न करता केवळ अक्षर लेखनाच्या माध्यमातून साहित्याचे द्वार खुले करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने त्यांनी अथक प्रयत्नातून संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा अभिनव ‘हरिपाठ’ अक्षरबध्द केला आहे. लवकरच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या संत साहित्याबरोबर कुसुमाग्रजांच्या निवडक कविता अन्वयार्थासह अनोख्या रुपात अक्षर प्रेमीसमोर येत आहेत.प्राचीन काळी शोषित, वंचित, असंघटीत घटकाला एकत्रित करण्यासाठी संत परंपरेने आपल्या अभंग तसेच लेखणाने समाजाला दिशा दर्शविण्याचे काम केले. ज्ञानाचे द्वार खुले होत असतांना अक्षर लेखनाची कला या निमित्ताने सर्वासमोर आली. यातून साहित्याची निर्मिती झाली. कालौघात साहित्याचे विविध प्रवाह तयार झाले आणि वाचन संस्कृती उदयास आली. सध्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे लेखन आणि वाचन या दोन्हींचा अस्त होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. याबाबत वैचारिक मंथनही होत आहे. मात्र साहित्यप्रेमींच्या मनातील किंतु गेला नाही. या मंथनात सुलेखनकार नंदू गंवादे, त्यांचे स्नेही नंदन राहणे, सायली आचार्य यांनी एकत्रित येत शब्द, आशय आणि अक्षर यांना एकत्रित घेत सुलेखनाच्या माध्यमातुन पाऊल उचलले. वाचन, लेखन जसे महत्वाचे आहे, तसेच त्याचा मूळ गाभा असलेले अक्षर लेखनही महत्वाचे आहे. हा संस्कार आजच्या पिढीवर रुजविण्यासाठी साधारणत: तीन ते चार महिन्यांपासून संत साहित्याचा अभ्यास करत असतांना संत नामदेवांचे निवडक अभंग राहणे यांनी संकलित केले. त्या अभंगाचा अभ्यास करत त्यातील अन्वयार्थ शोधत आचार्य यांनी ते शब्दबध्द केले. या शब्दांना मूर्तरुप देण्याचे काम गवांदे यांनी केले. आजच्या काळातही बोरू अन् शाईने लिहिलेले अभंग आपल्या अक्षर सामर्थ्यांने वाचकाला सकारात्मक विश्वात पोहचवितात. संतांची ही वचने आजच्या काळातही आपल्या जीवनाचे अमूल्य तत्वज्ञान सहज देऊन जातात. यासाठी गंवादे यांनी संहिता देवनागरी, मोडी, बंगाली, प्राकृत, रजन, नेवारी व चित्रलिपीच्या अलंकृत वळणाच्या पध्दतीने लिहून नितांत सुंदर स्वरूपात मांडणी केली आहे. अक्षरप्रेमींपर्यंत हा संत साहित्याचा विचार सहज जाऊन पोहचत आहे. त्यांची अभिनव फलश्रृती ‘संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा अभिनव हरिपाठच्या माध्यमातून साहित्य व अक्षरप्रेमीसमोर आली आहे. या अभिनव ग्रंथाचे प्रकाशन पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष भारत देसडला यांच्या हस्ते प्रकाशन झाले.लवकरच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या निवडक अभंगासह गीतेतील काही श्लोक, तात्यासाहेबांच्या निवडक कविता अन्वयार्थासह रसिकांच्या भेटीस येत आहे. आजच्या पिढीला व्हॉटस अप, फेसबुकपासुन दुर करत अक्षर लेखन, वाचनाचे महत्व पटवून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. तसेच ज्या लिपी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांची रचना, लिपी याची तोंडओळख व्हावी यासाठी हा खटाटोप असल्याचे गंवादे यांनी सांगितले.