शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तुटपुंज्या मानधनावरच ‘आरोग्यमित्र’ रुग्णांना सेवा देत असताना ‘एमडी इंडिया’ या विमा कंपनीकडमून दोन महिन्यांचे अद्यापही मानधन देण्यात आले नाही त्यामुळे आरोग्य मित्रांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’चा लाभ बीपीएल रुग्णांना मिळवून देण्यासाठी केवळ चार आरोग्य मित्राची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेचे आरोग्य मदत केंद्र २ जुलै २०१२ रोजी सुरू करण्यात आले.
रुग्णांची नोंद, त्यांची माहिती ठेवणे, संबंधित आजाराच्या रुग्णांना संबंधित डॉक्टरकडे नेणे, उपचारानंतर परत आणणे, रुग्णांच्या शस्त्रक्रियेची फाईल मंजुरीसाठी संबंधित डॉक्टरांकडे नेणे, यासारखी कामे आरोग्य मित्रांसाठी नेमून देण्यात आली आहे.
मेडिकलच्या मदत केंद्रात एकूण ४ आरोग्यमित्र रुग्णसेवा देत आहेत. त्यांना ‘एमडी इंडिया’ या विमा कंपनीकडून महिन्याला ५ हजार ४०० रुपये मानधन दिले जाते. कामाचा व्याप लक्षात घेता मिळत असलेले मानधन तुटपुंजे असल्यामुळे त्यांनी अधिष्ठांत्यासह विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन दिली मात्र, त्या निवेदनावर कुठलाही निर्णय होत नाही.
 वाढीव मानधनाची अपेक्षा करीत असताना आरोग्य मित्रांना कुठलीही सूचना न देता गेल्या ऑक्टोबर आणि डिसेंबर या दोन महिन्यातील वेतनातून कपात केली आहे. अचानक करण्यात आलेल्या या कपातीमुळे आरोग्य मित्रांनी नाराजी व्यक्त केली.
ऑक्टोबर व डिसेंबर महिन्यात एकही दिवस सुटी न घेतल्याने कंपनीने मानधनात कपात कशी केली? असा प्रश्न आरोग्य मित्रांनी उपस्थित केला आहे.
कंपनीने आणि मेडिकल प्रशासनाने या संदर्भात दखल घेतली नाही तर काम बंद करण्याचा इशारा आरोग्यमित्रानी दिला आहे.