*उघडय़ावरील खाद्य पदार्थ टाळावेत*जेवणाआधी व जेवणानंतर * हात स्वच्छ धुणे *पिण्याच्या पाण्यासाठी जीवनरक्षक ड्रापचा अवलंब करावा.गंगापूर धरणातून सध्या तळाचे पाणी घेण्यात येत असल्याने शहरवासीयांना गढूळ पाणी प्यावे लागत असून त्याचा परिणाम आरोग्याच्या तक्रारी वाढण्यात झाल्या आहेत. दूषित पाण्यामुळे उलटय़ा, जुलाब यांसारखे आजार बळावले आहेत. या पाश्र्वभूमीवर, नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.महिनाभर पावसाने दडी मारल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा हळूहळू तळ गाठण्याच्या मार्गावर आहे. महापालिकेने सावधगिरीचा उपाय म्हणून शहर परिसरात पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने शहरात ज्या ठिकाणी दोन वेळा पाणीपुरवठा होतो, तिथे आता एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. अखेरच्या टप्प्यात तळातील पाणी उचलले जात असल्याने गाळमिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. दूषित पाणी आणि हवेतील वाढलेली आद्र्रता यामुळे खाद्य पदार्थ तसेच पाण्यातील विषाणू वाढण्यास मदत झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्यामुळे सध्या उलटय़ा, जुलाब या साथीच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. पावसाळा आला की आपल्याकडे गरमागरम भजी आणि चहा याची आपसूक आवड निर्माण होते. खाद्य पदार्थ खाण्याबाबत वाद नाही. मात्र बाहेरील उघडय़ावरील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्य खालवण्यास सुरुवात होते आणि त्यास दूषित पाण्याची साथ मिळते असे मत डॉ. एस. आर. येरमाळकर यांनी व्यक्त केले. ही बाब साथीचे आजार बळावण्यास कारक ठरली आहे. दूषित पाण्यामुळे सध्या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढल्याचे डॉ. प्रणोती सावकार यांनी सांगितले. प्रामुख्याने पोटाविषयीच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांनी पाणी आधी गाळून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर ते उकळवून घेतल्यास पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होईल, असे डॉ. सावकार यांनी सांगितले. पाणी उकळून घेणे आणि उघडय़ावरील खाद्यपदार्थ टाळणे यामुळे आरोग्याच्या तक्रारी बहुतांश कमी होतील असेही त्या म्हणाल्या.