शेती व्यवसायास पशुपालनाची जोड दिल्यास शेतकऱ्यांसाठी ते फलदायी ठरेल, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले.
पशुसंवर्धन विभागातर्फे भोरिपगाव (तालुका वसमत) येथे पशुपालक मेळावा व पशुआरोग्य रक्षणविषयक तांत्रिक माहिती या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन दांडेगावकर यांच्या हस्ते झाले. रोकडेश्वरचे अध्यक्ष प्रल्हादराव राखोडे, राजाभाऊ डाखोरे, सरपंच महानंदा पाटील आदी उपस्थित होते. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एम. ए. खान यांनी नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली. जिल्हा उपायुक्त डॉ. प्रकाश उंबरकर यांनी पशुधनाविषयी शेतकरीवर्गाला मार्गदर्शन केले. दांडेगावकर यांनी सांगितले की, शेतकरी बांधवांनी आपल्या आर्थिक प्रगतीसाठी पशुपालनाकरिता आधुनिक तंत्राचा वापर करावा. शेती व्यवसायाला पशुपालनाची जोड फलदायी ठरते. बदलत्या काळासोबतच शेतकऱ्यांनी आपल्यातही बदल करून घेणे क्रमप्राप्त ठरते. शेतकऱ्यांनी दूध उत्पादनावरसुद्धा अधिक भर द्यावा, असे आवाहन केले.