तळी आणि वन समृद्ध म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्य़ात पक्ष्यांच्या विविध प्रजातींचीही संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. जिल्ह्य़ात अनेक भागात बगळ्यांचे अस्तित्व असून बगळ्यांचे थवे पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्याचे नैसर्गिक काम अव्याहतपणे बजावतात. बगळ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने शिकाऱ्यांच्या टोळ्यांनीही आपले लक्ष्य त्याकडे वळविले असून रोज किमान १५-२० बगळ्यांची शिकार केली जात असल्याने जिल्ह्य़ातील बगळे झपाटय़ाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
काही मुरलेले शिकारी तर काहीवेळा हौशी शिकारी मांसासाठी बगळ्यांना ठार करीत असून त्याविरुद्ध आता पर्यावरणवादी जागरूक झाले आहेत. ग्रीन हेरिटेज या संस्थेने बगळ्यांच्या शिकारीविरुद्ध आवाज उठविला असून अशा शिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. भंडाऱ्यात डेरेदार वृक्षांची संख्या भरपूर असल्याने बगळ्यांचे थवे वास्तव्यासाठी या वृक्षांवर येतात. शेकडो बगळ्यांचे प्रजनन या वृक्षांवर होते. त्यांची अंडी मिळवण्यासाठी आणि पिल्लांच्या शिकारीसाठी टपलेले लोक त्यांचा नाहक जीव घेत असल्याने बगळा ही प्रजातीच धोक्यात असल्याचा इशारा ग्रीन हेरिटेजच्या कार्यकर्त्यां छाया कावळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला.
जिल्ह्य़ाच्या तुलसीनगर परिसरात असलेली मोठाली बाभळीची झाडे बगळ्यांच्या विणीच्या का़ळात थव्यांनी गजबजलेली असतात. झाडाच्या वरच्या भागातबांधलेली घरटी, पिल्ले आणि बगळ्यांच्या थव्यांचा मुक्त विहार डोळ्यांना सुखवतो. बगळ्यांची संख्या इतकी प्रचंड असते की, दुरून पूर्ण झाड पांढरे शुभ्र दिसते. दुदैवाने अशा प्रत्येक झाडावरील १५-२० बगळ्यांची दररोज शिकार केली जात आहे. त्यांचा जीव घेणे हा एक पोरखेळ झाला आहे.
 अलीकडेच आढळलेल्या घटनांमध्ये झाडाखाली बगळ्यांचे रक्त, पिसे, फुटलेली अंडी रोज दिसून येत आहेत. एका झाडावर तर दररोज सकाळी मुलांची एक टोळी गुल्लेरीने बगळ्यांचा वेध घेते. वेगात आलेला दगड लागल्याने जखमी झालेले मोठे बगळे गंभीर जखमी होतात. अनेकदा लहान पिल्ले आणि अंडीही खाली पडतात. त्यांच्या मांसाचा उपयोग खाण्यासाठी किंवा खाटकांना विकण्यासाठी केला जात आहे.
या घटना अत्यंत गंभीर असून अशा उपद्व्यापांमुळे बगळ्याच्या प्रजातीवरच आक्रमण झाले आहे. छाया कोवळे यांनी हा विषय प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतरहीबगळ्यांच्या शिकारींचे प्रमाण कमी झालेले नाही. बगळ्यांना टिपणाऱ्या मुलांच्या टोळ्यांचे उत्तर आम्ही बगळे विकतो आणि घरीही खातो, असे आहे. परंतु, या मुलांवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची हिंमत वाढत चालली आहे.
या प्रकाराबद्दल ग्रीन हेरिटेज संस्थेने वनविभाग  तसेच पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तरीही बगळ्यांचे शिरकाण सुरूच असल्याने पक्षीप्रेमींमध्ये चिंतेची लहर पसरली आहे.
भंडाऱ्यात डेरेदार वृक्षांची संख्या भरपूर असल्याने बगळ्यांचे थवे वास्तव्यासाठी या वृक्षांवर येतात. शेकडो बगळ्यांचे प्रजनन या वृक्षांवर होते. त्यांची अंडी मिळवण्यासाठी आणि पिल्लांच्या शिकारीसाठी टपलेले लोक त्यांचा नाहक जीव घेत असल्याने बगळा ही प्रजातीच धोक्यात असल्याचा इशारा ग्रीन हेरिटेजच्या कार्यकर्त्यां छाया कावळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला.