आषाढी एकादशीनिमित्त सोलापूर शहर व परिसरात हजारो भाविकांनी विठ्ठल मंदिरांमध्ये जाऊन सश्रध्द भावनेने विठुरायाचे दर्शन घेतले. यानिमित्ताने अनेक विठ्ठल मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. सर्वत्र चिंब पावसाबरोबरच भक्तिमय वातावरण दिसत होते. शहरात दक्षिण कसब्यातील शुभराय महाराज मठातून ‘श्री’ ची रथयात्रा निघाली होती. या रथयात्रेला २३३ वर्षांची परंपरा असल्याचे सांगण्यात आले.पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी लाखो वारक-यांसह संतांच्या पालख्यांचा दळभार पोहोचला असताना सोलापूर शहर व परिसरात आदल्या दिवसापासूनच आषाढी एकादशीनिमित्त विविध शाळांनी बालविद्यार्थ्यांच्या सहभागातून दिंडय़ा काढल्या होत्या. यात साक्षात विठ्ठल-रुक्मिणीसह संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत मुक्ताई अशा विविध संतांच्या वेशभूषा केलेल्या बालविद्यार्थ्यांना पाहताना प्रसन्नता वाटत होती. चौपाड विठ्ठल मंदिर, जुने विठ्ठल मंदिर, भडंगे गल्लीतील विठ्ठल मंदिर, पांजरापोळ चौकातील मातंग समाजाचे विठ्ठल मंदिर, बेगम पेठेतील स्वकुळ साळी समाजाचे विठ्ठल मंदिर, तुळजापूर वेशीतील काशी कपडे समाजाचे विठ्ठल मंदिर, फलटण गल्लीतील विठ्ठल मंदिर, शुक्रवार पेठेतील भावसार समाजाचे विठ्ठल मंदिर, गवळी वस्तीतील विठ्ठल मंदिर, कुंभार वेशीतील विठ्ठल मंदिर आदी अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. कीर्तन-प्रवचनांसह भारूड, गवळणी आदी कार्यक्रमही झाले. प्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभर संततधार सुरूच होती. या पावसातच भाविकांनी अनेक मंदिरांमध्ये लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारी दक्षिण कसब्यातील शुभराय मठातून रथोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला. या रथोत्सवाला २३३ वर्षांची परंपरा आहे. पारंपरिक मार्गावरून निघालेल्या या रथाचे दर्शन शेकडो भाविकांनी घेतले. शुभांगी बुवा, प्रा. ॠतुराज बुवा व त्यांच्या सहका-यांनी रथोत्सवाचे नियोजन केले होते.आषाढी एकादशीनिमित्त उपवास केला जातो. त्यासाठी साबूदाणा, खजूर, रताळे, भगर, भुईमूग शेंगा आदी पदार्थांचा वापर केला जातो. सोलापूर कृषी बाजारात १२० क्विंटल रताळ्यांची आवक झाली होती. रताळ्याचा प्रतिकिलो दर २० रुपये, तर भगर ६० ते ७० रुपये, खजूर ६५ ते ७० रुपये याप्रमाणे दर होते. वाढत्या महागाईला तोंड देत सामान्यजनांनी उपवासाचे पदार्थ घेतले व पांडुरंगाची भक्ती केली.