महाराष्ट्रात शहरीकरणाचा सर्वाधिक वेग असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि नाशिक या शहरांनी अंगीकारलेली जीवनशैली अशाश्वत असून त्यामुळे नागरिकांना अनेक समस्या भेडसावतात. या शहरांमध्ये पिके नाहीत, अन्न, धान्य, भाज्या, वीज आणि पाण्यासाठी सुद्धा या शहरांना आजूबाजूच्या गावांवर अवलंबून राहावे लागते. परिसरातील गावांचे शोषण करून ही शहरे जगतात, असे प्रतिपादन सोलापूर विज्ञान ग्राम व अंकोली पाण्याची बँक या संकल्पनेचे प्रवर्तक अरुण देशपांडे यांनी ठाण्यामध्ये आयोजित कार्यक्रमात केले. पर्यावरण दक्षता मंच, ठाणे संस्थेचा १५ वा वर्धापनदिन नुकताच मराठी ग्रंथसंग्रहालयात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विज्ञानग्राम व अंकोली पाण्याची बँक संकल्पनेचे प्रवर्तक अरुण देशपांडे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक डॉ. विनय सहस्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर पर्यावरण दक्षता मंचाचे अध्यक्ष डॉ. विकास हजिरनिस, सरचिटणीस प्रा. विद्याधर वालावलकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अरुण देशपांडे यांनी उपस्थितांशी संवाद साधत ‘मुंठा पुराणा’ या मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक या शहरांच्या एकूण जीवनशैलीचा वेध घेतला. कोळसा आणि पेट्रोल या इंधनांवर आधारित जीवनशैली सध्या शहरांनी अवलंबली असून शहरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी बाहेरून येत असतात. हे शहरीकरण अत्यंत तकलादू असून त्यातून फक्त प्रदूषणच निर्माण होते. यावरचा उपाय म्हणून अंकोली येथील प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली असून या ठिकाणी निर्माण करण्यात येणाऱ्या ऊर्जेच्या ५ टक्के ऊर्जेचा वापर केला जातो, अशी माहिती अरुण देशपांडे यांनी दिली. यावेळी मार्गदर्शन करताना विनय सहस्रबुद्धे यांनी पर्यावरण दक्षता मंचचे अभिनंदन केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धोरणात्मक कार्यक्रम राबवण्यासाठी संस्थेने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सुचविले. पर्यावरण दक्षता मंचाच्या संगीता जोशी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. यावेळी पर्यावरण शाळेच्या विविध उपक्रमांच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तर पर्यावरण दक्षता मंच संस्थेच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या ई-बुक्सचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. पर्यावरण दक्षता मंच संस्थेच्या संकेतस्थळावर ही पुस्तके वाचकांना मिळू शकणार आहेत.