ऊस दराच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील ऊस पट्टय़ात गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. या भागातील रस्ते वाहतूक ठप्प झाली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात िहसक कृत्ये करण्याचा सल्ला ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांनी दिल्याचा आरोप करीत त्यांच्या पुतळ्याचे तासगाव येथे निषेध करून दहन करण्यात आले. या वेळी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे यांच्यासह पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  
 सांगली नजीकच्या कर्नाळ, नांद्रे, वसगडेसह ऊस पट्टय़ातील शेकडो गावांमध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळून ऊस आंदोलनाला पाठिंबा दिला. संतप्त शेतकऱ्यांनी सांगली-पलूस मार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको करून रस्ते अडविले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनीच ऊस दराचे आंदोलन भडकावल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे अध्यक्ष संदीप राजोबा यांनी केला आहे.
सांगली जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन आता तीव्र होत आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशानंतर पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाचे लोन पसरले आहे. बघेल तेथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकत्रे रस्त्यावर उतरले आहेत. सांगली जिल्ह्यातील ऊस पट्टय़ात ऊस दराचे आंदोलन चांगलेच भडकले आहे. सांगली नजीकच्या नांद्रे वसगडे पलूस या ऊस पट्टय़ातील नागरिक, शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
वसगडे गावात शेतकऱ्यांनी रास्ता रोको करीत या मार्गावरील वाहतूक ठप्प केली. तसेच तासगाव तालुक्यात  तासगावसह शिरगाव, कवठेएकंद, वासुंबे, नागाव, पलूस,  आदी ठिकाणी  दगडे आणि काटे टाकून रस्ते बंद करण्यात आले आहेत.या आंदोलनात ऊस पट्टय़ातील शेकडो गावांनी बंद पाळून या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे.
दरम्यान, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शेतकरी आंदोलनात उतरवून हे आंदोलन िहसक बनवले असून त्याच्या आदेशानेच महामार्गावर गाडय़ांची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. जयंत पाटील यांचा निषेध करीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी तासगाव व वसगडे येथे जयंत पाटील यांचा पुतळा जाळला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन आता आणखीन आक्रमक होत आहे. गावागावांचा या आंदोलनांना पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे या पाश्र्वभूमीवर सांगलीच्या एसटी आगाराने ग्रामीण भागात जाणाऱ्या सर्व एसटी बसेस रद्द केल्या आहेत. त्यामुळे रद्द केलेल्या सर्व गाडय़ा एसटी डेपोमध्ये लावण्यात आल्या आहेत. एसटी बंद असल्याने सांगलीचे बस स्थानक पूर्णपणे ओस पडले आहे. त्यामुळे या मोकळ्या स्थानकावर चालक आणि वाहकांनी क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. एसटी बंद असल्याने प्रवाशांची मात्र पुरती अडचण झाली. त्यामुळे स्वाभिमानीने शासनाला दिलेल्या ४८ तासांच्या मुदतीत ऊस दराचा तिढा सुटला नाही, तर ऊस दराचे आंदोलन हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.