पिझ्झा देण्याच्या बहाण्याने वरळी येथे घरात शिरून अभियंता असलेल्या तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा आणि नंतर चाकूने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न हे गंभीर कृत्य कुण्या सराईत गुन्हेगाराचे नसून अवघ्या १७ वर्षांच्या मुलाचे आहे. गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसतानाही हा अल्पवयीन मुलगा असे कृत्य कसे करू शकतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकूणच बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून त्यात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याची धक्कादायक माहिती ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात समोर आली आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे बाल गुन्हेगारीत मुलांबरोबरच मुलींची संख्याही लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे.देशातील गुन्ह्यांची नोंद ठेवणाऱ्या केंद्र सरकारच्या अखत्यारितील नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने नुकतीच विविध गुन्ह्यांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार संपूर्ण देशातील बालगुन्हेगारीत ११.२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०११ साली देशात २५,१२५ बालगुन्हेगारांचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यात वाढ झाली असून २०१२ मध्ये हा आकडा २७,९३६ झाला आहे. बालगुन्हेगारीत मध्यप्रदेश आघाडीवर असून तेथे २०१२ मध्ये ६,२४७ गुन्हे नोंदविले गेले. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात ६,२१८ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. महाराष्ट्रात बालगुन्हेगारांनी या वर्षांत १८३ हत्या केल्या असून १०६ बलात्कार प्रकरणात त्यांचा सहभाग आहे. १८ वर्षांखालील मुलांचा बालगुन्हेगारीत समावेश होतो. पण केवळ मुलेच बालगुन्हेगारी करत असतील तर तो समज खोटा आहे. कारण गुन्हेगारीत मुलींचाही सहभाग वाढत असल्याचे आकडेवारीतून सिद्ध होत आहे. २०११ मध्ये देशात १९७८ अल्पवयीन मुलींचा गुन्ह्य़ात सहभाग होता. त्यात वाढ होऊन २०१३ मध्ये ती संख्या २०५८ झाली आहे. प्रामुख्याने अनाथ असलेली मुले गुन्हेगारीकडे वळतात, असा समजही आता खोटा ठरला आहे. देशातल्या बालगुन्हेगारांपैकी ७९ टक्के मुले पालकांसमवेत राहतात तर केवळ ६ टक्के मुले अनाथ असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.देशपातळीवरील बाल गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्यांची आकडेवारीहत्यामध्यप्रदेश- १९७महाराष्ट्र- १८३हत्येचा प्रयत्नमहाराष्ट्र- १८८मध्यप्रदेश- १८३बलात्कारमध्यप्रदेश -२८४उत्तर प्रदेश- १२३राजस्थान -१०९महाराष्ट्र- १०६बालगुन्हेगारीतील अग्रेसर राज्यमध्य प्रदेश- ६,२४७महाराष्ट्र - ६, २१८राजस्थान- २,४४५आंधप्रदेश- २३३१