जून व जुलै महिन्यात सरासरीपेक्षा दीडपटीने सतत झालेली अतिवृष्टी, सीमावर्ती व जिल्ह्य़ातील धरणांमधून पाण्याचा झालेला विसर्ग, गोसीखुर्दच्या डाव्या कालव्याच्या अपूर्ण कामांमु़ळे पाणी अडून आलेली थोप आदी कारणांमु़ळे जिल्ह्य़ातील धान, सोयाबीन, भाजीपाला व अन्य खरीप पिकांची नासाडी झाली असून ओला दुष्का़ळ घोषित करा, ही मागणी जोर धरत आहे.              
जिल्ह्य़ात ८७८ गावे असून सर्वेक्षण ४२१ बाधित गावांचे करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षणाचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला असून  त्यात ४२१ गावातील ११ हजार २३१ हेक्टरमधील पिकांची नासाडी झाल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात अधिक नुकसान झाल्याची शक्यता बोलली जात आहे.     पूर व अतिवृष्टीमु़ळे २१० गावातील ६०६ घरांचे नुकसान झाल्याची माहिती अहवालात असून त्यात ९ घरांचे पूर्णत:, तर ५९७ घरांचे अंशत: नुकसान दाखविले आहे. नुकसानग्रस्तांना ३ लाख ४६ हजार १५० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.