मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे उभारण्यात येत असलेल्या औदुंबर पाटील साखर कारखान्याला बेकायदेशीर परवानगी दिल्याच्या विरोधात सोलापुरात गेल्या दोन आठवडय़ांपासून आमरण उपोषण केले जात असताना त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आष्टी व परिसरातील २५ गावांच्या संतापलेल्या ग्रामस्थांनी सोलापूर-पुणे महामार्गावर शेटफळ येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी या आंदोलनाला हिंसक वळण लागून त्यात तहसीलदारांच्या तोंडाला काळे फासण्यात आले तर सहा एसटी बसेस फोडण्यात आल्या. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयराज डोंगरे व तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांच्यासह सुमारे सहाशे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांविरुध्द मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आष्टी येथे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी अध्यक्षा असलेल्या औदुंबर पाटील साखर कारखान्याची उभारणी केली जात आहे. या कारखान्यापासून अवघ्या दोन किलंोमीटर अंतरावर आष्टी तलाव असून या तलावावर परिसरातील प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. एकीकडे या साखर कारखान्याच्या उभारणीची जागा बदलण्यात आली तर दुसरीकडे त्यामुळे साखर कारखान्याचे दूषित व रसायनयुक्त पाणी आष्टी तलावात मिसळण्याचा धोका आहे. त्यामुळे स्थानिक सार्वजनिक आरोग्याला बाधा येण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. याच भूमिकेतून या कारखान्याच्या उभारणीला विरोध केला जात आहे. यात सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचाही गावकऱ्यांचा आरोप आहे.या प्रश्नावर सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आष्टी, पेनूर, शेटफळ व अन्य गावांतील ५७ कार्यकर्त्यांनी मागील दोन आठवडय़ांपासून आमरण उपोषण आरंभले आहे. परंतु या आंदोलनाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने गावकऱ्यांचा संताप अनावर होऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यात एस. टी.बसेसवर दगडफेक करण्यात आली. आंदोलनस्थळी आलेले तहसीलदार सदाशिव पडदुणे यांना काळे फासण्यात आले. या आंदोलनाने वाहतूक खोळंबली. परंतु अचानकपणे हिंसक वळण घेतल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलीसही गडबडले. त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळली.