महसूल प्रशासन लोकाभिमुख, गतिमान करण्यासाठी सुवर्णजयंती राजस्व अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत समाधान योजनेत अधिकाधिक जनतेला सहभागी करून घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जयस्वाल बोलत होते. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजय सावरीकर आदी उपस्थित होते. विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट दिवशी मंडळ स्तरावर एकत्र येऊन जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करणाऱ्या समाधान योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेचा जिल्ह्यातील प्रारंभ सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथे जयस्वाल यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांनी करमणूक कर, तसेच इतर महसूल वसुलीबाबत अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले. या बाबत सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांची विभागीय स्तरावर बठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असून याकामी सर्वानी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले. अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजी झावरे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, प्रवीण धरमकर, ब्रिजेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, अतिरिक्त सीईओ डी. व्ही. निला आदी उपस्थित होते.