आवक घटल्याने तसेच खर्च वाढल्याने दरवाढीचा परिणाम
सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे मासळीची आवकच कमी झाल्याने मासळी सुकविण्यासाठी शिल्लक राहत नसून मासेमारीवरील खर्चात वाढ झाल्याने सुक्या मासळीच्या दरात वाढ झाली आहे. दरामुळे खरेदीवरही परिणाम झाल्याची माहिती येथील मच्छीमार महिलांनी दिली आहे.
मे महिना उजाडल्याने पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी किनाऱ्यावरील रहिवाशांना हा आगोटीचा काळ असतो, या काळात ताजी मासळी उपलब्ध होत नसल्याने, त्याच प्रमाणे पावसाळ्यातील सुरुवातीचा काळ हा मासळीच्या प्रजननाचा कालावधी असल्याने मासेमारीवर बंदीही असते. त्यामुळे सुकविलेली मासळी खरेदी करून तिची पावसाळ्याच्या चार महिन्यांसाठी साठवणूक केली जाते. मात्र सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे मासेमारीवरील खर्चात वाढ झाल्याने सुक्या मासळीच्या दरात वाढ झाली आहे.
मासळीसाठी प्रसिद्ध असलेल्या उरण तालुक्यातील करंजा व अलिबागमधील पोयनाड तसेच पेणमधील वडखळ येथील मासळी मार्केटमध्ये सुक्या मासळीच्या खरेदीसाठी गर्दी होत असली तरी वाढलेल्या दरामुळे खरेदीवरही परिणाम झाल्याची माहिती येथील मच्छीमार महिलांनी दिली आहे. सध्या सर्वत्र मान्सूनपूर्व खरेदीला सुरुवात झालेली आहे. यात लोणच्यासाठी कच्चे आंबे, मसाल्यासाठी मिरच्या,पापड, शेवया बनविण्यासाठी लागणारे पिठे यांचीही खरेदी सुरू आहे.
रायगड जिल्ह्य़ातील औद्योगिकीकरणामुळे शेतीचे प्रमाण कमी होत असले तरी येथील बहुतांशी समाज हा शेतकरी आहे. त्यामुळे शेतकरी म्हणून असलेली जगण्याची परंपरा मात्र कायम आहे. त्याचाच परिणाम म्हणून आजही पावळ्यापूर्वीच्या खरेदीची परंपरा कायम आहे.
अनेक मासळीचे प्रकार हे समुद्राच्या किनाऱ्यावरील मासेमारीत सापडत असले तरी किनाऱ्यावरील वाढलेल्या प्रदूषणामुळे मासळीच्या प्रमाणात घट होत असल्याने सामान्य खवय्यांना सुक्या मासळीच्या महागाईला सामोरे जावे लागत आहे.

२०० ते २५० रुपये दर   
सुकटीचे किलोमागे २०० रुपये मोजावे लागत आहेत. तर त्यानंतर वाकटय़ाचे दर २०० ते २५० रुपये तेही मासळीची प्रत पाहून ठरले जात आहेत. सुकटीमधीलच मोठा प्रकार असलेली आंबड सुकट २०० रुपये, मांदेली-१५० ते २०० रुपये, सुके बोंबील-२५० रुपये, ढोमी-१५० रुपये, माकल्या २५० रुपये तर सुक्या कोळंब्यांचे सोडे ८०० ते १००० रुपये किलोपर्यंत पोहचलेले आहेत. यापैकी