महाराष्ट्राच्या खंडाचे प्रकाशनअठरापगड जाती-जमाती आणि त्याच्या कित्येक पटीत भाषा, बोलीभाषा बोलल्या जाणाऱ्या भारतात नेमक्या किती भाषा बोलल्या जातात त्याचे संशोधन नुकतेच पूर्ण झाले आहे. संपूर्ण देशात आजमितीला ७८० भाषांची आणि ६६ लिप्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात मराठीची १४ रूपे आढळली असून समुद्रकिनारी तसेच डोंगराळ प्रदेशामुळे निर्मिती झालेल्या भाषिक व सांस्कृतिक जीवनाची ओळखही यातून पुढे आली आहे. ब्रिटिशांनी शंभर वर्षांपूर्वी केलेल्या भाषा संशोधनानंतर प्रथमच केवळ लोकसहभागातून संपूर्ण देशातील हा महाप्रकल्प पूर्ण झाला आहे.महाराष्ट्रात मराठी, गुजराती, सिंधी, उर्दू या भाषांचा समावेश आहेत. मराठी या भाषेची १४ बोलीभाषा रूपेही आढळली. महाराष्ट्राला लाभलेल्या किनाऱ्यामुळे खाखा, कोळी, मांगेली, नॉलिंग, सिद्दी (आफ्रिकेतील स्थलांतरित) या भाषाही इथे बोलल्या जातात. डोंगराळ प्रदेशांमध्ये राहणाऱ्या आदिवासींच्या भाषिक आणि सांस्कृतिक जीवनाची ओळखही या सर्वेक्षणातून समोर आली आहे. आदिवासींच्या अंबुदी, चौधरी, डांगी, देहवाली, धोडी, डुंगरा भिल्ली, डुंगारी भिल्ली, गमीत, गोंडी, हलबी, हळपती, कथली, कथोडी, कातकरी, कोलामी, कोलघा, कोरकू, कोटवाडी, कुंकना, माडीया, मल्हार कोळी, मावची, नायकी, निमाडी, पंचमहाली भिल्ली, परधानी, पावरी, राठवी, ताडवी, तालवी आणि वारली अशा अनेक भाषांची नोंद या संशोधनातून समोर आली आहे. राज्यात भटक्या विमुक्त जातीही विपुल प्रमाणात आहेत. त्यांच्या भाषांची वैशिष्टय़ेही या सर्वेक्षणाच्या माध्यमातून नोंदवली गेली. बहुरूपी, बेलदार, भातू, चामथी, पारोशी, पारधी, मदारी, कोल्हाटी, कुंचीकोरवा अशा अनेक भाषा राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुढे आल्या आहेत. मेम नी, मीर-मरासी, मेहर अशा भाषांची दखलही या सर्वेक्षणात घेण्यात आली. या माहितीचे संकलन करून तयार करण्यात आलेल्या ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र’ या खंडाचे प्रकाशन १७ ऑगस्ट रोजी पुणे येथे होत आहे. शंभर वर्षांपूर्वी जॉर्ज ग्रिअर्सन यांनी ब्रिटिश काळात भारतीय भाषांचे संशोधन केले होते. त्यानंतर आता सरकारी मदतीशिवाय, लोकसहभागातून हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. दर दहा मैलांवर बोलीभाषा बदलण्याचा अनुभव या देशात येतो. मात्र या बोलीभाषांची नोंद घेण्याचा तसेच त्यांच्या जतनाचा कोणताही ठोस कार्यक्रम आतापर्यंत हाती घेण्यात आला नव्हता. बडोदा येथे भाषा संशोधन केंद्राची स्थापना करणाऱ्या डॉ. गणेश देवी यांच्या संकल्पनेतून आणि नियोजनातून उभ्या राहिलेल्या या प्रकल्पात महाराष्ट्राच्या भाषा सर्वेक्षणाचे काम लेखक व प्रकाशक अरुण जाखडे यांनी पाहिले. भारतीय भाषांची नोंद, मौखिक परंपरा, दस्तावेजीकरण करून भाषा संवर्धनाचे काम भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण या प्रकल्पातून करण्यात आले आहे.