इन्हेलेशन थेरपी ही अस्थमावरील उपचारातील सर्वात कार्यक्षम उपचार पद्धती असून ती माफक दरात उपलब्ध असल्याची माहिती अस्थमा व छातीरोग तज्ज्ञ डॉ. विवेक गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. अस्थमा हा जुनाट आजार असून त्यावर दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. औषधे घेतल्यावर काही आठवडय़ांनी बरे वाटल्यानंतर अनेक रुग्ण उपचार घेणे सोडून देतात. उपचार घेणे थांबवल्याने हा आजार पुन्हा बळावतो आणि त्याची परिणती अस्थमाचा अटॅक येण्यात होत असल्याने हे धोकादायक ठरू शकते. रुग्ण उपचार थांबवण्याची अनेक कारणे आहेत. अस्थमावर नियंत्रण करायचे असेल तर हे अडथळे दूर करणे आणि इन्हेलेशन थेरपीचे महत्त्व समजून घेऊन ती सातत्यपूर्ण पद्धतीने घेत राहणे, गरजेचे असल्याचेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. वारंवार येणारा खोकला, अगदी सकाळी येणारा खोकला, श्वास फुलणे आणि घरघर लागणे यासारख्या लक्षणांवर अनेक लोक साध्या औषधांचा वापर करतात. त्यातच इन्हेलर्सविषयी योग्य माहिती नसल्याने अस्थमा रुग्ण डॉक्टरांना गोळ्यास लिहून देण्यास सांगतात. सध्या भारतातील ८० टक्के अस्थमाचे रुग्ण गोळ्या घेणे पसंत करतात. तर उर्वरित फक्त २० टक्के रुग्ण इन्हेलर्सचा वापर करतात. त्यामुळे इन्हेलर्सच्या गैरसमजुती मोडीत काढणे अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले. इन्हेलर्समुळे ज्या ठिकाणी औषधाची गरज आहे, तेथेच ते औषध जाते. त्यामुळे त्याचा परिणाम गोळ्यांपेक्षा अधिक लवकर होतो. त्यामुळे इन्हेलर्स पद्धती ही लोकप्रिय होत असल्याचेही त्यांनी सांगितले. अस्थमा असलेल्या मुलांना लवकरात लवकर इन्हेलेशन थेरपीची सुरुवात केल्यास हा आजार नियंत्रित करण्यास मदत होते. त्यांच्या फुफ्फुसाची स्थिती सुधारली जाते. असे असताना बहुतांश पालक गोळ्यांचीच मागणी करतात. सुशिक्षित आणि सधन पालकांना सुद्धा इन्हेलेशन थेरपी पटवून देणे जास्त कठीण असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा हजारे यांनी यावेळी दिली. गोळ्यांपेक्षा इन्हेलर पद्धती ही चांगली आहे. त्यासाठी इन्हेलर पद्धती पालकांनी डॉक्टरांकडून शिकणे अत्यावश्यक आहे. अस्थमाची लक्षणे व त्यावरील उपचार पद्धती व त्यासंबधी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सिप्ला या कंपनीने जनजागृतीवर भर दिला आहे, असेही डॉ. हजारे यांनी सांगितले.