महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करणाऱ्या महिला इच्छुकांची पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे व सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी आज संवाद साधत चाचपणी केली. दीड तासात ४५ महिला इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. प्रभाग ८, १४, १६ व २६ मध्ये उमेदवारी मागणा-या महिलांची संख्या अधिक होती.
तत्पूर्वी झालेल्या बैठकीत अ‍ॅड. व्यवहारे यांनी मनपाची निवडणूक आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची नांदी आहे, मात्र या दोन्ही निवडणुकीपेक्षा प्रभागांची निवडणूक अवघड आहे, कारण नागरिक व्यक्ती पाहून मतदान करतात, जात व पैसा यापेक्षा संपर्काला अधिक महत्त्व आहे, असे सांगितले.
बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे हे राज्यातील दोन कार्यक्षम मंत्री नगर जिल्हय़ातीलच आहेत. त्यांचा मनपा निवडणुकीसाठी उपयोग करून घ्यावा. निवडुन आल्यानंतर पक्षसंघटनेला कोणी विचारत नाहीत, त्यामुळे आपण मुद्दामहून निवडणुकीपूर्वी भेटण्यास आलो आहोत. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष दोघेही विकासाच्या मुद्यावर अभियान राबवत आहेत, त्याचा उपयोग करून महिला उमेदवारांनी घराघरांत पोहोचावे, असे आवाहन त्यांनी केले.
युतीने शहरात भयमुक्तीचा नारा देत निवडणूक लढवली, मात्र युतीचा मनपातील कारभार पाहता भ्रष्टाचारमुक्तीच्या मुद्यावरच आपल्याला निवडणूक लढवावी लागणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रीजलाल सारडा यांनी सांगितले. प्रदेश संनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनायक देशमुख, नगरसेवक बाळासाहेब पवार, नागवडे यांची भाषणे झाली. शहर जिल्हाध्यक्ष सविता मोरे यांनी प्रास्ताविक केले.
बैठकीनंतर व्यवहारे, नागवडे, मोरे आदींनी महिला इच्छुकांशी चर्चा केली. महिलाही शिष्टमंडळे घेऊन उपस्थित होत्या. व्यवहारे यांनी त्यांना प्रचारयंत्रणा कशी राबवावी याची माहिती देताना प्रभागांची सद्य:स्थितीची माहिती घेतली.