तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास साधून या उद्योगाची जपणूक करून सक्षम नेतृत्व केल्याबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी उपाध्यक्ष, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला.लखनौ येथे झालेल्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री कुंवर आनंदसिंग, तंत्रज्ञानमंत्री अभिषेक मिश्रा, होमगार्डमंत्री ब्रह्मशंकर त्रिपाठी यांनी हा पुरस्कार कोल्हे यांना प्रदान केला. संस्थेचे अध्यक्ष जी. एस. राव यांनी कोल्हे यांनी राष्ट्रीय सहकारी साखर संघ, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. सत्कारास उत्तर देताना शंकरराव कोल्हे म्हणाले, काळय़ा आईची सेवा करणारा शेतकरी सुखी झाला पाहिजे, त्याच्या शेतीला शाश्वत पाणी मिळाले पाहिजे, यासाठी आपला आयुष्यभर संघर्ष सुरू आहे असे सांगून त्यात साथ देणा-या सहका-यांना हा पुरस्कार समर्पित केला. फोटो ओळी-भारत सरकार अंगीकृत शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना साखर उद्योगात केलेल्या कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.