आरोग्य विभागामार्फत नवनवीन योजना जाहीर केल्या जात आहेत. मात्र, अंमलबजावणीत िधडवडे उडत असल्यामुळे कागदोपत्री योजना कितीही चांगल्या असल्या, तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ मात्र होत नसल्याचे चित्र समोर येत आहे.
आरोग्य विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत अधिकाऱ्यांमध्येच समन्वय नसल्याचे चित्र दिसून आले. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, जिल्हा शल्यचिकित्सक बसवराज कोरे, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे समन्वयक डॉ. कुलदीप शिरपूरकर, डॉ. एस. जी. पाठक, डॉ. डी. एम. धन्वे, डॉ. महेश पाटील आदी उपस्थित होते.
जिल्ह्य़ात गेल्या २१ नोव्हेंबरपासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू झाली. योजनेत ९७१ अतिगंभीर अशा विशिष्ट उपचार व १२१ पाठपुरावा पद्धतींचा समावेश आहे. जिल्हय़ातील ४ लाख ३४ हजार ७पकी ४ लाख १८ हजार ७७२ कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत आरोग्यपत्र वाटप होणार असल्याचे जाहीर केले असले, तरी ते मिळवण्यासाठी पाठपुरावा मात्र लाभार्थ्यांनाच विविध स्तरावर करावा लागणार आहे. जानेवारीअखेर जिल्हय़ात ७७ हजार २०८ आरोग्यपत्रांचे वाटप झाले. मार्चअखेर सर्व लाभार्थ्यांना ओळखपत्र वाटप केले जाईल, असे विधान या वेळी करण्यात आले. मात्र, याची अंमलबजावणी कशी होणार? जिल्हय़ात पुरेशी ई-सेवा व संग्राम केंद्रे आहेत का? लाभार्थ्यांना योजना माहिती आहे का? या प्रश्नांची उत्तरे कोणालाही देता आली नाहीत. उलट सरकारने गेल्या १७ डिसेंबरला काढलेला अध्यादेशच पत्रकार बैठकीत देण्यात आला. त्यात लाभार्थ्यांनी आपले आरोग्य ओळखपत्र मिळवण्यास स्वतहून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, असे म्हटले आहे. त्यामुळे ही जबाबदारी आपली नसल्याचे सांगत आरोग्य विभागाने व महसूल विभागानेही हात झटकले.
जिल्हय़ाची लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास आहे. लातूर शहरातील केवळ ११ रुग्णालयात आतापर्यंत ३०६ रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला. नवीन रुग्णालये या योजनेत समाविष्ट होण्यास तयार नाहीत. राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत जिल्हय़ातील हत्तीरोगावर नियंत्रण मिळवण्यास विशेष कार्यक्रम आखला आहे. डासांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हा रोग बळावतो. सांडपाण्याचा निचरा करा, रात्री झोपताना अंगभर कपडे वापरा, मच्छरदाण्यांचा वापर करा, यासाठीचे प्रबोधन केले जाणार आहे. राज्यातील हत्तीरोग प्रादुर्भावाच्या १७ जिल्हय़ांत लातूरचा समावेश आहे. जिल्हय़ात ३ हजार ९२२ हत्तीरोगाचे, तर १ हजार ९८ हत्तीपाय रोगाचे रुग्ण आहेत. देवणी, उदगीर, अहमदपूर, निलंगा या कर्नाटक सीमेलगतच्या तालुक्यांत या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी प्रबोधन केले जाणार असले तरी अन्य विभागामार्फत एकत्रितपणे कार्यक्रम राबवला जात नसल्यामुळे २००५ पासून ‘नेमिची येतो पावसाळा’प्रमाणे हिवताप कार्यालयामार्फत कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.