‘रेलनीर’प्रकल्पामुळे तलाव होणार बाटली बंद
  डोंगर करून छोटा विकासाचा आव मोठा!

ब्रिटिशांनी कल्याण रेल्वे स्थानकास पाणीपुरवठा करण्यासाठी अंबरनाथजवळील काकोळे गावाजवळील तलावावर धरण बांधले. गेली काही वर्षे वापराविना पडून असणाऱ्या या धरणावर रेल्वे प्रशासनाने रेलनीर प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्पाचे कामही सुरू झाले आहे. या प्रकल्पामुळे येथील पाणी बाटलीबंद होणार आहे. मात्र मुळात धरण गावाच्या जागेत बांधण्यात आल्याने येथील पाणी ग्रामस्थांनाही मिळावे, अशी काकोळेकरांची मागणी आहे, कारण गावातील बहुतेकांचे तबेले असून दुधाचा व्यवसाय आहे. अशा प्रकारे धरण गमावून बसण्याची चिंता असतानाच एमआयडीसीलाही अतिरिक्त अंबरनाथ टप्पा क्र. २ साठी याच परिसरातील जमीन हवी आहे. त्यामुळे केवळ काकोळेच नव्हे, तर या भागातील पाले, गोरपे, बोहोणोली, आंभे, शिरवली आदी परिसरांतील ग्रामस्थांच्या विकासासाठी आम्ही किती वेळा आणि का उजाड व्हायचे, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
खरे तर या भागातील वाढते औद्योगिकीकरण आणि नागरीकरणासाठी ब्रिटिशकालीन काकोळे धरणाचे पाणी उपयुक्त ठरले असते. रेल्वे प्रशासनाकडून पाठपुरावा करून ते धरण राज्य शासनाने ताब्यात घेणे आवश्यक होते, कारण या धरणातून प्रतिदिन ३ ते ५ दशलक्ष लिटर्स प्रतिदिन पाणीपुरवठा होऊ शकतो. मात्र याबाबतीत लोकप्रतिनिधींचे प्रयत्न तोकडे पडले. तलावाच्या काठी असणारे सदाहरित जंगल लाकूडमाफियांनी उजाड केले. आता तलावाचेही व्यापारीकरण होणार आहे. काकोळेकरांची १८५ एकर जागा या तलावासाठी घेण्यात आली. आता उरलीसुरली जागा एमआयडीसी मागत आहे. काकोळेलगत असणाऱ्या शिरवली गावावरून अति उच्चदाबाच्या दोन विद्युतवाहिन्या गेल्या आहेत. त्यामुळे गावकऱ्यांच्या डोक्यावर सतत भीतीची टांगती तलवार असते. विशेषत: पावसाळ्यात खूप काळजी घ्यावी लागते. आता पुन्हा आणखी एक अतिउच्च दाबाची विद्युतवाहिनी गावातून टाकण्यात येणार आहे. ‘गेल’नेही गावातील जागा घेतली आहे. आता एमआयडीसी औद्योगिक विकासासाठी जागा मागत आहे.
स्टोव्हच्या
पीना बनविणारे गाव
याच परिसरात असणाऱ्या ढोके गावात स्टोव्हच्या पिना बनविण्याचे आठ ते दहा कारखाने आहेत. गावकरी आपली शेती आणि परंपरागत जोडधंदे सांभाळून स्टोव्हच्या पिना बनवितात. या स्टोव्हच्या पिना उल्हासनगरमधील व्यापारी खरेदी करतात. पूर्वी गावकरी उल्हासनगरमध्ये जाऊन तिथे कारखान्यात काम करीत होते. पुढे पुढे त्यांनी घरीच यंत्रांवर पिना बनविणे सुरू केले. त्यामुळे त्यांचा येण्या-जाण्याचा वेळ आणि खर्च वाचला. यामुळे त्यांना शेतीच्या कामांकडेही लक्ष देता येते. पिना बनविण्याचे काम नगावर असते. कुटुंबातील अनेक सदस्य फावल्या वेळी हे काम करतात. स्टोव्हच्या पिना बनविणारे अशी या गावाची ख्याती आहे. या परिसरातील अनेक गावांमध्ये उद्योगी उल्हासनगरसाठी चॉकलेटस्ना वेष्टन गुंडाळणे, इलेक्ट्रिक आणि अथवा इलेक्ट्रॉनिक्स सुटय़ा भागांची जुळणी करणे अशा प्रकारची कामे आऊटसोर्सिग पद्धतीने केली जातात.