ढालेगाव येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या शेख अन्सर शेख महेबुब या १८ वर्षांच्या युवकाच्या खिशातील आठ हजार रुपये पोलिसांनीच काढून घेतले, अशी गंभीर तक्रार शिवसेनेचे कल्याण रेंगे यांनी केली असून मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा पोलिस कर्मचार्याचा हा प्रकार चीड आणणारा आहे.
शेख अन्सर हा बहिणीच्या लग्नासाठी माजलगावला २५ हजार रुपये घेवून जात असतांना ढालेगाव येथे पत्र्याखाली दबून मरण पावल्याची दुर्दैवी घटना घडली.
अन्सर यांना पाथरीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले तेव्हा पोलिसांनी पंचनाम्यात केळ १७ हजार रुपयांचा उल्लेख दाखवला. याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी श्री. रेंगे यांनी पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली आहे.
ढालेगाव येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर महसुल अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देणे आवश्यक होते. परंतू तहसीलदार श्री.गाडे हे घटना घडल्यानंतर तब्बल सोळा तासांनी घटनास्थळी पोहोचले. या दिरंगाईबद्दल आमदार मिरा रेंगे यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.
दरम्यान ग्रामीण भागातील वादळी वाऱ्यामुळे विजेचा तारा तुटल्या. त्यामुळे उमरा, गुंज, गंडगाव, अंधापुरी, लोणी, बाभळगाव, कानसूर आदी भागात वीजपुरवठा अजूनही खंडीत आहे.
पाथरी तालुक्यात आंबा, टरबूज, खरबूज यांचे फार मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. आज शुक्रवापर्यंत महसूल विभागाच्यावतीने पंचनामे सुरू करण्यात आले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी व्यक्त होत आहे.