गेल्या सलग चार दिवसांपासून जिल्ह्य़ात पावसाचा मुक्काम असून कयाधू नदी प्रथमच वाहती झाली आहे. सर्वच तालुक्यांनी पावसाच्या सरासरीची ‘शंभरी’ ओलांडली. आजअखेर पडलेल्या पावसाची सरासरी १३०.५६ मिमी, तर सरासरी टक्केवारी १४.६६ मिमी आहे. गतवर्षी आजच्या तारखेपर्यंत सरासरीत १.४४ टक्के नोंद होती. सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये, कंसात एकूण सरासरी पाऊस. हिंगोली ५२ (११७.२७), वसमत २७.५७ (१५९.९८), कळमनुरी ४१ (११२.३१), औंढा नागनाथ २९.७५ (१३६.७५), सेनगाव ६५ (१२६.४९). एकूण २१५.३२ मिमी. गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्य़ात सूर्यदर्शन घडले नाही. शनिवारी कयाधू नदी प्रथमच वाहती झाली. जिल्ह्य़ाच्या सर्व भागात शेतकऱ्यांना प्रथमच जून महिन्यात खरीप पिकांची पेरणी करण्याची संधी मिळाली आहे. खत व बियाणांचा मुबलक साठा व्यापाऱ्यांकडे उपलब्ध असून खताच्या खरेदीसाठी रांगा लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली नसल्याचे चित्र आहे.