राज्य विधिमंडळाचे अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू होत असून त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच राज्यातील अंगणवाडी सेविका मानधनात वाढ व्हावी या मागणीसाठी बंद ठेवणार आहेत.मध्यंतरी स्थगित केलेल्या आंदोलनाला पुन्हा एकदा नव्याने सुरूवात होणार आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ व्हावी, या मुख्य मागणीसाठी शुक्रवारी अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी २५ फेब्रुवारी अंगणवाडय़ा बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या आंदोलनात शिवाजी परूळेकर, बाळेशा नाईक, राजश्री बाबन्नावर, सुरेखा गायकवाड, प्रेमा पाटील, अंजना शारबिद्रे, अमिता कुरणे, शोभा जाधव, रंजना गोईलकर,शांता कोरवी यांच्यासह अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडी सेविकांचा निवृत्ती वेतनाचा निर्णय घेतल्यानंतर मानधनाबाबतही निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते.आठवडय़ाभरात हा निर्णय होईल, असे आश्वासन दिल्याने अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने बेमुदत काम बंदचे आंदोलन मागे घेतले होते.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मंत्रिमंडळाच्या दोन बैठका पार पडल्या. त्यामध्ये अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनाबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचा-यांनी पुन्हा एकदा नव्याने आंदोलनाला हात घालण्याचे ठरविले आहे. २४ फेब्रुवारीपासून मंत्रिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असून २५ फेब्रुवारीला राज्यातील अंगणवाडी बंद ठेवून अंगणवाडी कर्मचारी मोर्चाने मंत्रालयावर जाणार आहेत, असा इशारा आज या आंदोलनावेळी देण्यात आला.