विसापुर धरणात कुकडीचे आवर्तन मिळावे यासाठी काँग्रेसचे नेते कुंडलीकराव जगताप यांनी कार्यकर्त्यांसह कालव्याचे दरवाजे तोडण्याचा इशारा देताच कुकडीच्या आधिकाऱ्यांनी तलावात पाणी सोडण्यास सुरूवात केली. आजच १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. श्रीगोंदे तालुक्यात सध्या कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले आहे मात्र हे आवर्तन फक्त शेतीसाठी असल्याने विसापुर तलावात कुकडीचे पाणी सोडण्यात येणार नाही अशी भुमिका कुकडीचे कार्यकारी अभियंता खताळ यांनी जाहीर केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते व कुकडी कारखान्याचे संस्थापक कुडंलीकराव जगताप, कारखान्याचे अध्यक्ष राहूल जगताप, बाळासाहेब नहाटा यांच्या नेतृत्वाखाली तलावात पाणी सोडण्यासाठी आज दरवाजे तोडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मोठय़ा संख्येने कार्यकर्तेही जमले होते.