‘काटय़ा-कुटय़ाचा तुडवित रस्ता’ असे सांगत ‘गावाकडे चल माझ्या दोस्ता’ अशी साद घालणारे कवी इंद्रजित भालेराव यांची साहित्य जगतातील प्रतिष्ठेच्या लाभशेटवार साहित्य पुरस्कारासाठी यंदा निवड झाली. ‘कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक’ असे सांगणाऱ्या या कवीच्या शिरपेचात या निमित्ताने आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.शालेय विद्यार्थ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्व स्तरात स्वत:च्या कवितेचा रसिकवर्ग निर्माण करणाऱ्या भालेराव यांची कविता यापूर्वी विविध सन्मानाने अलंकृत झाली असली, तरी या पुरस्काराच्या निमित्ताने लाभशेटवार प्रतिष्ठानने मराठवाडय़ातल्या एका प्रतिभावंताची नोंद घेतली गेली. यापूर्वी श्री. ना. पेंडसे, विंदा करंदीकर, गंगाधर गाडगीळ, भालचंद्र नेमाडे, आनंद यादव, अनिल अवचट, राजन गवस, विश्वास पाटील, अरूणा ढेरे, भारत सासणे आदींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. भालेराव यांच्या रूपाने मराठवाडय़ातील प्रतिभावंताला पहिल्यांदाच लाभशेटवार प्रतिष्ठानने सन्मानित केले आहे.‘पीक पाणी’, ‘आम्ही काबाडाचे धनी’, ‘दूर राहिला गाव’, ‘पेरा’, ‘टाहो’ यांसारख्या विविध कवितासंग्रहांमधून भालेराव यांच्या कवितेचा प्रवास अधोरेखित झाला आहे. विविध विद्यापीठांमधून त्यांच्या कविता अभ्यासक्रमात आहेतच. मात्र, एम. फील व पीएच. डी. साठीही अनेकांनी या कवितेचा अभ्यास केला आहे. भालेराव यांची ही सर्व कविता आता एकत्रितरीत्या रसिकवाचकांसाठी व अभ्यासकांसाठी उपलब्ध होत आहे. ‘सारे रान’ या नावाने त्यांची समग्र कविता श्रीकांत उमरीकर यांनी संपादित केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या विविध मान्यवरांनी भालेराव यांच्या कवितेचा घेतलेला वेध ‘आकलन, आस्वाद आणि आक्षेप’ या नावाने प्रसिद्ध होत आहे. प्रा. भगवान काळे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे.भालेराव यांच्या अनेक कविता डॉ. अशोक जोंधळे यांनी संगीतबद्ध केल्या. ‘माझा बाप शेतकरी’ आणि ‘माय बाई’ हे त्यांचे अल्बम लोकप्रिय आहेत. नुकत्याच पार पडलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात भालेराव यांची प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीतूनही त्यांचे अंतरंग उलगडले गेले. लाभशेटवार प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे वितरण २९ जानेवारीला परभणीतच सायंकाळी ५ वाजता शारदा महाविद्यालयात होणार आहे. भालेराव यांच्या कवितेला यापूर्वी अनेक मानसन्मान मिळाले असले, तरीही लाभशेटवार पुरस्काराने या कवितेची झळाळी आणखी वाढली आहे.