भारत संचार निगम लिमिटेडच्या तार सेवेने देशवासीयांना १६३ वर्षांची अविरत सेवा दिली असून देशातील शेवटचा तार नागपुरातील शास्त्री लेआऊट, सुभाषनगरच्या कविता मकरंद बेदरकर यांनी सोलापूरला त्यांच्या आई लक्ष्मी वाघमारे यांना रात्री ११.५५ वाजता पाठवली आहे.तार सेवेची आपल्याला सुखदु:खात क्षणोक्षणी साथ मिळाली असून ही सेवा जीवनाचा एक भाग बनली आहे. या सेवेने इतिहास घडवला असून आता ही सेवा समाप्त होत आहे. येणाऱ्या पिढीला आता ‘तार’ हा शब्द केवळ पुस्तकातच वाचायला मिळणार आहे. कित्येकांनी शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या नातेवाईकांना तार पाठवून या सेवेचा लाभ घेतला. या सेवेने सुखदु:खाचे अनेक संदेश पोहचवले आहेत. अशा या सेवेचा शेवटचा तार नागपुरातून पाठवणे हे नागपूर आणि विदर्भासाठी गर्वाची बाब आहे. नागपुरातील सुभाषनगरच्या कविता बेदरकर यांनी त्यांच्या सोलापूरच्या आई लक्ष्मी वाघमारे यांना पाठवला आहे. ‘ये सुंदर जीवन माँ तुम से मिला, सुख दु:ख का संदेश, १६३ वर्ष अविरत चला,हे तार सेवा बहुत ऋण है तेरा,इसके उपलक्ष में माँ तुम्हे औरसभी देश के तार सेवा को सलाम मेरा’हा संदेश असलेली तार कविताने आपल्या आईला पाठवली आहे. नागपूर येथील सीएससी-१, सीटीओ तार कार्यालयातून १४ जुलैच्या रात्री ११.५५ वाजता बुकिंग क्र. ८२९ व पावती क्र. २०२ असलेला एका मुलीचा आपल्या आईच्या नावाने पाठवलेला हा देशातील शेवटचा तारसंदेश आहे.