एलबीटीबाबत महापालिका व व्यापारी यांच्यातील चर्चेला योग्य वळण मिळत असून, तिढा सुटण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे लोकांत समाधानाचे वातावरण आहे.
बाजार समितीने एलबीटीविरोधात बाजारपेठ ‘बंद’चे आंदोलन केले. त्यानंतर आडत व्यापाऱ्यांनी मनपा आयुक्तांना होकार दर्शविला आहे. त्यातून सोमवारपासून बाजारपेठ सुरू झाली. एलबीटीचा निर्णय केवळ लातूर शहराचा नसून राज्य सरकारचा आहे. एलबीटीची अंमलबजावणी न केल्यास शहराचा दैनंदिन कारभारही चालू शकणार नाही. सरकारचे अनुदान बंद झाल्यामुळे सुविधा देणे अडचणीचे ठरणार असल्याचे व्यापारी महासंघ व मनपा प्रशासनाच्या बैठकीत आयुक्तांना सांगितले.
त्यानंतर व्यापारी प्रतिनिधींनी एलबीटीचे दर कमी करावेत व आपल्या सूचनांचा विचार केला जावा, सूचना स्वीकारल्याचे कळवल्यानंतर त्या दिवशीपासूनच एलबीटीची आकारणी करावी, अशी भूमिका घेतली.
या भूमिकेला आयुक्तांनी संमती दर्शविल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून व्यापारी व मनपा प्रशासन यांच्यातील ते नाते ताणले होते, तो तणाव आता दूर होतो आहे.