कोयना,चांदोली धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केल्याने सांगलीला निर्माण झालेला महापुराचा धोका आता टळला असून नागरिकांसोबतच प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास टाकला. शनिवारी सायंकाळी कृष्णा नदीतील पाण्याची पातळी बहे या ठिकाणी ६ इंचाने उतरली असून सांगली नजीक आयर्वनि पुलाजवळ पाणी पातळी ३८ फुटांवर स्थिर आहे.
जलसंपदा विभागाने धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसताच पाण्याचा विसर्गही कमी केला आहे. शुक्रवारी कोयना धरणातून ६१ हजार क्युसेक्सचा होणारा विसर्ग कमी करण्यात आला असून आज या ठिकाणाहून ४५ हजार ६०० क्युसेक्स प्रतिसेकंद पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर चांदोली धरणातील पाण्याचा विसर्ग ५० टक्के कमी करण्यात आला आहे. या ठिकाणी ८९९५ क्युसेक्स विसर्ग केला जात आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता संपलेल्या आठ तासांत कोयना येथे ५३ मि.मी. नवजा येथे ४० मि.मी. आणि महाबळेश्वर येथे ५१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अलमट्टी धरणातून अद्याप २ लाख ५४ हजार ६७२  क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
कृष्णानदीतील बहे या ठिकाणी पाण्याची पातळी सकाळी आठ वाजता १२ फूट ५ इंच होती. सायंकाळी पाच वाजता मात्र ही पाणी पातळी १२ फुटांवर आली आहे. यामुळे नदीकाठावरील लोकवस्तीला निर्माण झालेला महापुराचा धोका आता टळला आहे. सांगली येथे आयर्वनि पुलानजीक मात्र कृष्णानदीची पाणी पातळी ३८ फूट असून उद्यापर्यंत ही पाणी पातळी आणखी खाली येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र कर्नाळ रोडवर अद्याप पाणी असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक माधवनगर माग्रे वळविण्यात आली आहे.
कोल्हापुरात पावसाची विश्रांती; ७१ बंधारे अजून पाण्याखाली
प्रतिनिधी, कोल्हापूर
गेले दहा दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने शनिवारी विश्रांती घेतली असली, तरी अद्यापही जिल्ह्य़ातील ७१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर चार राज्य, २२ जिल्हा यांसह ५६ मार्ग अतिवृष्टीमुळे खंडित झाले आहेत. राधानगरी धरणातून ६ हजार ४००, वारणा धरणातून १५ हजार ३७ व दूधगंगा धरणातून १० हजार ३०० घनफूट सेंकद याप्रमाणे विसर्ग सुरू आहे. तर जिल्ह्य़ात ४ राज्यमार्ग पडझड झालेआहेत.
कोल्हापूर शहर परिसरासह काळम्मावाडी, राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर गेल्या २४ तासांत कमी झाला आहे. त्यामुळे सात स्वयंचलित उघडलेल्या दरवाजांपैकी एक दरवाजा खुला राहिला आहे. त्यामुळे पंचगंगा, कुंभी, कासारी नदीच्या पाणीपात्रात किंचितशी घट झाली आहे. मात्र गत आठवडय़ातील पावसाच्या जोरामुळे जिल्ह्य़ातील विविध नदीकाठी असणाऱ्या ३० घरांची पडझड झाली आहे. यामध्ये राधानगरी पाच, पन्हाळा सात, चंदगड सहा, आजरा तीन आणि हातकणंगले एक अशा घरांचा समावेश आहे. घरातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. राधानगरी तालुक्यातील तारळे येथे एक घर कच्चे बांधकाम असल्यामुळे पूर्णपणे पडले आहे.
कोयना धरणक्षेत्रासह कृष्णा व कोयना नद्यांकाठचा पाऊस काहीसा मंदावला;
दुष्काळी पट्टय़ातही तुलनेत बऱ्यापैकी पाऊस
वार्ताहर, कराड
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठावरील पावसाचा जोर काहीसा ओसरला असल्याने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. बळीराजा वरूणराजाला धन्यवाद देत असल्याचे दिसून येत आहे. तर, पावसाच्या उघडीपीमुळे बाजारपेठा पुन्हा गजबजू लागल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत दुष्काळी पट्टय़ातही बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. मात्र हा पाऊस निश्चितच समाधानकारक म्हणता येणार नाही.  चालू हंगामात आजवर दुष्काळी खटाव तालुक्यात २०५.३, फलटण तालुक्यात १५३.६ तर, माण तालुक्यात अत्यल्प असा ११२.६ मि. मी. पाऊस झाल्याची आकडेवारी प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेबारा फुटांपर्यंत उचलून कोयना नदीपात्रात ५६ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याचवेळी धरणात ४८ हजार ५२३ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. परिणामी कोयना धरणाची पाणीपातळी २,१४५ फुटांवर नियंत्रित करण्यात धरण व्यवस्थापनाला यश येत असून, कृष्णा, कोयनाकाठच्या महापुराचा संभाव्य धोका तुर्तास तरी पूरता टळला आहे. पूरसदृश्य स्थितीत वाहणाऱ्या कृष्णा, कोयना नद्यांची पाणीपातळी काहीसी ओसरण्याची शक्यता पाटबंधारे खात्याने व्यक्त केली आहे.
गेल्या २४ तासांत कोयना जलाशयाची पाणीपातळी १ फुट ४ इंचाने कमी म्हणजेच २,१४८ फुट ७ इंच असून, पाणीसाठा ८६.६३ म्हणजेच ८२.३० टक्के आहे. आज दिवसभरात कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात ५३, नवजा विभागात ४० तर, महाबळेश्वर विभागात ५१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत कराड तालुक्यात ५ एकूण ३४४.१५ तर, पाटण तालुक्यात २३.३ एकूण १२६७.८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
सांगलीच्या पश्चिम भागात संततधार तर आटपाडीत अजूनही छावण्यांचा आधार
सांगली :
सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागाला पाऊस झोडपत असताना दुष्काळी आटपाडी तालुक्यात अद्याप जनावरांसाठी चारा छावण्याचाच आधार घ्यावा लागत आहे. पावसाअभावी जनावरांसाठी चारा उपलब्ध झालेला नसतानाही प्रशासनाने छावण्या बंद करण्याचा प्रयत्न चालविल्याने सुमारे ४१ हजार जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील ६ छावण्या शुक्रवारी प्रशासनाने तडकाफडकी बंद केल्याने असंतोष पसरला आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ या तालुक्यात अद्याप मोठा पाऊस झालेला नाही. आटपाडी तालुक्यात तर पाऊस सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला असला तरी, या दोन महिन्यात सरासरी १५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात काही क्षेत्रात पेरणी झाली असली, तरी दिघंची परिसरात नापेर क्षेत्र जास्त आहे. जनावरांना अद्याप चारा उपलब्ध झाला नसल्यामुळे आणि ओढय़ा-नाल्यांना पाणी नसल्याने आहे ते पशुधन छावणीच्या आश्रयाने तग धरून आहे.
प्रशासनाने मात्र कागदोपत्री अहवाल तयार करून चारा छावण्यांची गरज नाही, असे भासविण्याचा प्रयत्न चालविला आहे. आटपाडी तालुक्यातील िपपरी-बुद्रुक, िपपरी-खुर्द, मानेवाडी, औटेवाडी, घरनिकी आणि वाक्षेवाडी येथील चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय काल जाहीर केला. त्यामुळे या ठिकाणी आश्रयाला आलेल्या ३८८३ जनावरांना वाऱ्यावर सोडले आहे.
तालुक्यातील काही वाडय़ा-वस्त्यांना अद्याप टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी पाण्याचा उद्भवच तालुक्यात नसल्याने हे टँकर सोलापूर जिल्ह्यातील चिकमहुद, कोळे आणि अचकदाणी या गावातून भरून आणले जात आहे. तालुक्यातील सुमारे १ लाख लोक आजच्या घडीलाही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. ओढय़ा-नाल्यांना पाणी नसल्यामुळे स्थानिक पातळीवर अद्याप जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता झालेली नाही. अशी परिस्थिती असताना प्रशासनाचा चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय पशुधनाच्या जीवावर उठणारा ठरणारा आहे.

unclean water supply, Thane, Rumors of unclean water,
ठाणे, कल्याणात अशुद्ध पाणीपुरवठ्याची अफवा; पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका
Two more days of hailstrome in Vidarbha Pune news
विदर्भात आणखी दोन दिवस गारपीट; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्याना दिला इशारा
Nighoje bandhara Leakage Leads to Water Shortage in Pimpri
पिंपरी : निघोजे बंधाऱ्याला गळती…पिंपरी-चिंचवडमधील समाविष्ट गावांत पाण्याचा प्रश्न
water storage in balkawadi dam
सातारा : बलकवडीचा जलसाठा तळाशी; धरणात फक्त २२ टक्के मृत पाणीसाठा