टिळकनगर रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी पाण्याचा दाब अचानक वाढल्यामुळे तानसा जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाला आणि लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. परिणामी परिसरातील रहिवाशांना सोमवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
पाण्याचा दाब अचानक वाढल्यामुळे हा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाला आणि त्यातून पाण्याचे कारंजे उडू लागले. या पाण्यामुळे आसपासचा परिसर जलमय झाला. घटनेचे वृत्त समजताच पालिकेच्या जल विभागातील कर्मचाऱ्यांनी व्हॉल्व्हची दुरुस्ती युद्धपातळीवर हाती घेतली. हे काम मंगळवारी सकाळपर्यंत पूर्ण होईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.जलवाहिनीतून मोठय़ा प्रमाणावर झालेल्या गळतीमुळे नेहरूनगर, टिळकनगर, कसाईवाडा, चुनाभट्टी, कामगारनगर, एव्हरार्डनगर या भागांत सोमवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. मात्र मंगळवारी सकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागात सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.