गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा उत्साहात पार पडणाऱ्या कृषी प्रदर्शनाकडे लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनीही पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. महिला लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्याने हे प्रदर्शन कसेबसे उरकण्यात आले.नांदेड जिल्हा परिषदेचे तत्कालीन कृषी सभापती नामदेवराव केशवे यांनी माहूर येथे दत्त जयंतीनिमित्त होणाऱ्या यात्राकाळात कृषी प्रदर्शन भरवण्याची प्रथा सुरू केली. पण शेतक ऱ्यांसाठी व ग्राहकांच्या हितासाठी आवश्यक असलेली ही परंपरा पुढे सुरू ठेवण्याबाबत कृषी विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.उद्घाटन सोहळ्याला खासदार सुभाष वानखेडे, आमदार प्रदीप नाईक, जि.प.चे उपाध्यक्ष प्रकाश राठोड, कृषी विकास अधिकारी एम. पी. गोंडेस्वार, तालुका कृषी अधिकारी एस. बी. शितोळे हे उपस्थित राहणार होते. लोकप्रतिनिधी तर सोडाच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या प्रदर्शनाकडे पाठ फिरवली. खासदार वानखेडे अन्य कामात व्यस्त असल्याने, आमदार नाईक अमेरिकेला रवाना झाल्याने आपले कोण काय करणार, अशा अविर्भावात कृषी अधिकारी मुंबईला तर तालुका कृषी अधिकारी रजेवर गेल्याचे सांगण्यात आले. माळेगाव यात्रेबाबत राजकारण करू नका, असा सल्ला देणारे जि.प.चे उपाध्यक्ष प्रकाश राठोडही प्रदर्शनाकडे फिरकले नाहीत. पंचायत समितीच्या सभापती अनसूया राजूरकर, जि.प. सदस्या विमलताई खराटे, सरपंच नम्रता कीर्तने या महिला लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन कृषी प्रदर्शन उरकले.या कृषी प्रदर्शनात तालुक्यातील फळे, भाजीपाला व पिकांच्या स्पर्धा घेण्यात येतात. प्रदर्शनासाठी अनेक शेतक ऱ्यांनी आपले साहित्य आणले होते, पण पोलिसांनी त्यांना माहूरगडाच्या पायथ्याशीच रोखल्याने त्यांचे साहित्य प्रदर्शनात नटलेच नाही. मोजक्याच शेतकऱ्यांनी आणलेल्या साहित्याच्या आधारे भरलेले हे प्रदर्शन भविष्यात बंद पाडण्याचा विडा अधिकाऱ्यांनी उचलला की काय, अशी शंका काही शेतक ऱ्यांनी व्यक्त केली.