प्राथमिक शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटले तरीही पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना शासनाने पुस्तके उपलब्ध करून दिलेली नाहीत. विद्यार्थ्यांना पुस्तकेच मिळाली नसल्याने त्यांना काय शिकवायचे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. विद्यार्थ्यांना तातडीने पुस्तके उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जनशक्ती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कपील खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन आंदोलन केले व संबंधित अधिकाऱ्यास निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांजवळ पुस्तके नाहीत. शासनाने पुस्तकाचा पुरवठा अद्याप केलेला नाही. पुस्तकांचा पुरवठा तातडीने करावा अन्यथा, जनशक्ती संघटनेच्यावतीने जिल्हाभर शाळांना कुलूप ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाररा देण्यात आला.
यावेळी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष कपील खेडेकर, सचिन थिगळे, शहराध्यक्ष आशिष माळी, सुनील पवार, विजय लोखंडे, प्रशांत ढोरे, विशाल पवार, कुलदीप गायकवाड, देवानंद वानखेडे, अमोल उरसान, सतीश ठोसे, इम्रान शेख उपस्थित होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात येतील, हा शासनाचा दावा खोटा ठरला तर ज्या पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले त्यांनाही या चिमुकल्यांना पुस्तके मिळाली की नाहीत, याचा विसर पडल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.