श्रीमद्भगवद्गीतेवर भाष्य करणारे जे जे ग्रंथकार होऊन गेले त्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक महत्त्वाचे नाव आहे. लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथात भगवद्गीतेचा अर्थ कर्मयोगानुसार सांगितला. लोकमान्य टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलेल्या या ग्रंथाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने दुर्मीळ असलेला हा ग्रंथ ई साहित्य प्रतिष्ठानने माहितीच्या महाजालात आणला आहे.जून १९१५ मध्ये लोकमान्य टिळक यांनी निष्काम कर्मयोगाचे महत्त्व सांगणारा हा ग्रंथ प्रकाशित केला. यंदाच्या जून महिन्यात या ग्रंथाच्या प्रकाशनाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ई साहित्य प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर ‘गीतारहस्य’ ग्रंथाचे पाचही खंड विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सर्व खंडांची मिळून सुमारे एक हजार पाने असून ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे ‘गीतारहस्य’ ग्रंथाच्या इंग्रजी अनुवादाचे दोन खंडही लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हा ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेचा केवळ अनुवाद नाही किंवा त्यावरील टीकाही नाही. या पाच खंडांपैकी शेवटचा खंड श्लोकार्थाचा आहे. विविध विषयांवरील ई पुस्तके प्रकाशित करून ती जास्तीतजास्त मराठी साहित्यप्रेमी, चोखंदळ वाचक यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून ई साहित्य प्रतिष्ठान करत आहे. यंदाच्या वर्षी आत्तापर्यंत प्रतिष्ठानने ४० ई पुस्तके प्रकाशित केली असून ती सर्व प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध आहेत. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात संगणक आणि भ्रमणध्वनीचा वेगाने प्रचार होत असून याचा वापर करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जास्तीतजास्त वाचकांपर्यंत मराठी पुस्तके पोहोचविण्याचा उद्देश प्रतिष्ठानचा आहे. लोकमान्य टिळक यांच्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथाच्या पाच खंडांबरोबरच अन्यही विविध विषयांवरील पुस्तके www.esahity.com/ या संकेतस्थळावर पाहता आणि वाचता येऊ शकतील.