वसमत तालुक्यातील राहटी व सातेफळ फीडरवरून होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, तेलगाव ते राधोरा रस्ता दुरुस्त करावा, या मागण्यांसाठी तेलगाव पाटीवर सर्वपक्षीयांचे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल या वेळी तीव्र निषेध केला.
राहटी, सातेफळ परिसरात हट्टा येथील ३३ केव्ही उपकेंद्रावरून वीजपुरवठा खूपच कमी दाबाने होतो. त्यातच १४ तासांचे भारनियमन होत असल्याने शेतकरी हवालदिल आहे. पिकांना पाणी देणे गरजेचे असताना कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. परिणामी, वीजपंप जळण्याचे प्रमाण वाढले. कमी दाबाच्या वीजपुरवठय़ामुळे घरगुती उपकरणांचे मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वीज कंपनीकडे केल्या. मात्र, याकडे महावितरणकडून नेहमीच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
तेलगाव-रिधोरा रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीसाठी वारंवार निवेदने देऊन ही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वाहनचालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबत दुर्लक्षच करीत आहे. आंदोलनात काशिनाथ बेंडे, विष्णू कान्होळे, दत्तराव भालेराव, भगवानराव राऊत, सुरेश बेंडे, प्रकाश साबणे, पांडुरंग कातोरे, सुलभा कदम, सुरेश गव्हाणे, बालाजी यशवंते, श्याम हिरवे आदींचा समावेश होता.