दिवसभर साहित्यिक मेजवानीदिवंगत शिक्षक आमदार वसंत काळे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त तालुक्यातील पळसप येथे शनिवारी (दि. २ फेब्रुवारी) मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.संमेलनाचे उद्घाटन सकाळी साडेदहा वाजता विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर, तर विशेष अतिथी म्हणून खासदार रजनी पाटील, आमदार दिलीप सोपल व राणा जगजितसिंह पाटील उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून याचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. आर. माने यांच्या हस्ते होईल. संमेलनात दुपारी दीड वाजता ‘यशवंतराव चव्हाणांचे कृषी औद्योगिक धोरण : विचार आणि वास्तव’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव राहणार असून, यात ज्येष्ठ पत्रकार शरद कारखानीस, कृषी सल्लागार नाथराव कराडे सहभागी होणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता कथाकथन होणार असून यात दिगंबर कदम, गेनू शिंदे, विठ्ठल बुकन, काकासाहेब शिंदे यांचा सहभाग असणार आहे. अध्यक्षस्थानी ग. पी. मनूरकर राहतील. दुपारी साडेचार वाजता योगिराज माने यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. संमेलनाचा समारोप सायंकाळी सहा वाजता होईल. या वेळी पालकमंत्री मधुकर चव्हाण, आमदार बसवराज पाटील, साहित्यिक प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी उपस्थित राहतील.